Friday, December 12, 2014

अंधाराची एकेक पाकळी उलगडत उमलावा असाही एक फुलपाखरू दिवस... प्रसन्नतेच्या उंबरठ्यातून नाविन्याच दान होऊ पाहणारा.. नकोनाकोश्या संदर्भातून हवेहवेसे बंध जोडणारा दिवस...
............................................
किमान स्वतःच्या आयुष्यातल्या तरी सगळ्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी स्वतःला घेता आली , तर जगणं बरचसं सुरळीत होईल का गं बयो....
............................................
उगवतीच्या माथ्यावर लाल केशरी रंगपंचमीत न्हालेल्या पहाटेच्या डोळ्यात हमखास काजळ् रेघ ओढणारा सल असतो गं बयो . तिच्या गोऱ्यापान पावलांना माखलेला सोनसळी उन्हाचा रंगच सांगत असतो , सटवाइच्या रुपात तिच्या बेधुंद नाचण्याने कित्येकांची भविष्य अशीच चिरडली असतात तिने..
..............................................
साधारण ६०-७० वर्षाच्या आपल्या सरासरी आयुष्यात किमान हजारभर तरी लोकांना भेटतो नं आपण.. त्यातले शे-दोनशे आपल्याला ओळखायला लागतात किंवा आपण तरी ओळखतो.. त्या शे-दोनशे मधले किमान ५० आपले नातेवाईक असतात.. रक्ताच्या नात्याने किंवा अपरिहार्यपणे समाजाच्या चौकटीत राहण्यासाठी लादलेल्या नात्याने तरी..पण असतात ते.. वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले..असो तर आता उरले किती? १००-१५०.. त्या उरलेल्या १००-१५० लोकांपैकी आपण खरतर सगळ्यांनाच ओळखत असतोच.. पण नातं... असतंच का? असणं गरजेचं असतंच का? 
बयो मानलेली नाती हि इथे जन्म घेत असतील का गं? हवीहवीशी.. हवी तशी customized केलेली नाती.. आपली म्हटलेली.. आपुलकीची नाती..मनापासून मनापर्यंत रुजलेली मानलेली नाती..
....................................
हक्क. बयो हे हक्क प्रकरण मोठं कठीण गं . एखाद्या गोष्टीवर, जागेवर अगदीच गेला बाजार अगदीच चुकून एखाद्या व्यक्तीवर हक्क असणं अन हाच हक्क मुद्दाम जगाला दाखवून देणं ह्यातून त्या त्या वस्तूची जागेची अन अगदी व्यक्तीचीसुद्धा किंमत ठरते. ह्या हक्काची जाणीव असणे अन तो गाजवणे. खूप फरक पडतो गं
..................................................
एकेक गाठ हळुवार उलगडत जाता मोकळं होत जावं अलवार जपलेलं स्वत्व.. तशी सुटी सुटी होत जातात माणसं... मीपणाच्या शोधात
......................................................
अनवट वाटांवरचा हा प्रवास अचानक असा मुक्कामाला पोहोचतो. हवं ते सारं असं नेमकं समोर उभं. आनंद समाधान अन जिंकल्याची विलक्षण धुंदी. मागे वळून आपण काय दिव्य पार केलंय हे बघण्याच्या मोहात पडणारा हा क्षण. खरंतर इथेच शेवट हवा नं.तृप्त क्षणाला अंत. पण नाही हि सुरुवात असते. असंख्य अस्वस्थ हुरहुरत्या क्षणांची . अरे आता पुढे काय हा प्रश्न मुक्कामाचं ठिकाण आल्या आल्याच पडलेला असतो नं. अनवट वाट पुन्हा हाक मारतेच. एका आवर्तनाच्या पूर्णतेला दुसर्याची नांदी. प्रवास अविरत सुरूच
..........................................................
बदल.. हो बदलेल हेही कधीतरी ह्या एका विचारानेच तर प्रत्येक पाउल टाकत असतोच नं आपण.. जात असतो पुढे पुढे सतत .. आपल्याही नकळत.. ओलांडत असतो एक एक वळण.. हवंसं.. नकोसं.. कधी अनवधानाने मिळतो क्षण आनंदाचा.. तर कधी ठाऊक असतो काळ दुःखाचं... तरी..तरी प्रवास सुरूच..कुठपर्यंत? आपणच बदललो आहोत नखशिखांत हे कळेपर्यंत...
हे रे नेमक्या कुठल्या वळणावर कळतं? सांगशील?
............................................................
पहाटेच्या धुक्यातून हलकं हलकं पाझरणारं शुभ्र कोवळं ऊन... पाकळी पाकळीने उमलावा दिवस तसं दाणेदार किरणातून पसरलेलं.. आखीव रेखीव ऊन....हे उन नं कुरुवळत असतं स्वप्नांना...बळ देत असतं ती स्वप्न जगायला... एकटक भिडव कधी नजर त्या उन्हाशी.. सृष्टीचा कण अन कण सामावून लाघवी हसेल बघ ते.... तेच काय ते वरदान असतं रे बाकी ग्रहणाचे शाप तर त्यालाही आहेतच....
.........................................................

No comments:

Post a Comment