आताशा हे हळवेपण वरचेवरच छळायला लागलय...काही काळ-वेळ न बघाता मन उगाच अस्वस्थ..नकोनकोशी ती हुरहुर...आणि मग निर्णयाची ओढ..की शोध रे शेवटाचा? हे असं काही झालं नं की माझ्याही नकळत ओलावतात डोळ्यांच्या कडा..आणि फुरफुरणारं नाकं.. अगदीच रडायला वैगरे नाही रे येत तसं.. पण दिवसभर हा पाठलाग चुकवला तरी रात्री उशी भिजतेच...जराशीच हं...कारणांचा शोध अजुनही चालुच आहे..हो आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळही..पण कसं कोण जाणे ही वेडी संध्याकाळ उतरायला लागली नं की मलाच कळत जातं हा शोध...हा खेळ.. काही खरा नाही..खरंच काही असेल तर ते असतं फक्त एकटेपण..भरल्या घरातलं..गर्दीतलं..माझ्यातल्या मलाच खाणारं हे एकटेपण..हे एकटेपणही मोठं विचित्र रे..एकटं मुळी येताच येत नाही ह्याला...सोबतीला असतात असंख्य आठवणी, तुझ्या-माझ्या क्षणांच्या,विसरलेल्या त्या अलवार स्पर्शांच्या,अन् कधी कधी तर न बोललेल्या त्या मुक्या अबोल्याच्याही...आतापर्यंत सावरलेला हा खोटा खोटा मनाचा डोलारा कोसळतोच रे मग..अन् मग अवचित कधीतरी बांध फुटतो मनाचा..चढ्त्या रात्री मग उशाला असतो एकाकी चंद्र..चांदण्या रात्रीतही एकटा..अगदी आपल्यासारखा..की फक्त माझ्यासारखा... तुझा शोध तर अजुनही चालुच नं रे... जाउ दे कशाला पुन्हा तेच वाद..तेच प्रश्न...उत्तरं नसलेली..तसेही आताशा तुझे प्रश्नच बदलले सगळे.. तरी एक शेवट्चं... आजकाल हा हळवेपणा तुलाही छळतो का रे?
No comments:
Post a Comment