Wednesday, July 23, 2014

त्या कळण्या न कळण्याच्या सीमारेषेवरच्या तुझ्या असंख्य प्रश्नांपैकी ,नेमका तो प्रश्न मात्र अनुत्तरीतच ....अजूनही....ठाऊक असलेल्या सगळ्याच उत्तरांना प्रश्न पडावेत असं तर नाही नं

.......................................................................................

त्या कळण्या न कळण्याच्या सीमारेषेवरच्या तुझ्या असंख्य प्रश्नांपैकी ,नेमका तो प्रश्न मात्र अनुत्तरीतच ....अजूनही....ठाऊक असलेल्या सगळ्याच उत्तरांना प्रश्न पडावेत असं तर नाही नं

..........................................................................................
शोध घ्यायचाच म्हटलं की मग हवं नको सारंच उकरलं जाणार बघ .....पुन्हा एकदा...ते टाळता नाहीच गं येणार बयो ....मागे वळून बघणं म्हणूनच तितकसं सोपं नसतं नं....असंख्य वाटा दिसतात गं असं पाठमोरं वळताना...काही वाटांवर अर्थातच असतात आपल्या पायांचे ठसे...पण...काही जाणून बुजून टाळलेल्या कोर्या वाटा आजही असतातच गं तिथे.. त्यांचं खुणावणं असं दुर्लक्षणं जमणार आहे का तुला ? भुतकाळातल्या संदर्भांचा शोध जरुर घे...तुझ्या आजच्या असण्याचं स्पष्टीकरण नक्कीच आहे त्यात...पण जितकं खोल खोल जाशील तितकी तिथेच रुजत जाशील ह्याचं भान मात्र असू दे...
............................................................................................
मळभ ओसरल्यानंतरच्या निरभ्र आभाळातून झिरपत जातो एक एक किरण... लख्ख बोचरा..तरी हवाहवासा... किरण 
अचानक असं समोरं आलो की आपलंही असंच होतं नं रे ... सुरवातीची सर ओसरली की लख्ख होत जातात बोथटलेले नाजूक सल...एकमेकांना असं टाळणं नाहीच का रे जमणार कधी ?
...............................................................................................
कसं असतं नं कळायचंच म्हटलं नं की समोरचा माणूस एका मिनिटात कळतो रे .... नाहीतर अख्ख्या आयुष्यभर डोळ्यांना झापडं लावून तपासात बसतोच नं निरनिराळ्या भूतांची निरिक्षणं.. त्याच माणसाबद्दलची ..

................................................................................................
एखादं ध्येय.. उद्दिष्ट ठरवतो आपण... सुरु करतो ते गाठायचे प्रयत्न.. अगदी मनापासून प्रयत्न करत जातो अन रिझल्ट्सही मिळत जातात.. टप्प्याटप्प्याने का होईना पण आपलं ध्येय जवळ आलाय अस वाटायला लागतं... नेमकं ह्या वेळी आपल्या प्रयत्नात शिथिलता यायला लागते.. कंटाळा यायला लागतो त्याच त्या रुटीनचा... अन असं करता करता एक दिवस आपलं आपल्यालाच लक्षात येतं की अरेच्चा आपण पुन्हा एक पाऊल मागे आलोत कि... जे गाठायचं होतं ते जरा दूर भासायला लागलंय हे कळतं... हा.. नेमका हा क्षण आवडतो मला... रीअलाझेशनचा... घडून गेलेल्यांच्या त्यामागे न पडता पुन्हा पुढे जाण्याचा...मागे गेलेलं एक पाऊल पुन्हा रिदम मध्ये आणत पुढे जाण्याचा... हो हाच क्षण मनापासून आवडतो मला..पुन्हा पुन्हा चुकण्याचा अन त्या सुधारण्याचा क्षण...
..................................................................................................

आपल्या आजूबाजुला वावरणारे नं असंख्य ओळखीचे चेहरे असतात पण सालं बर्याच चेहर्यांशी कधीच connect होता येत नाही असं का? कितीही प्रयत्न करा नशीबाचं no network..किंवा 'आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करु इच्छिता ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे' 
अशा चेहर्यांना खरंच ओळखीचं म्हणायचं?

..........................................................................................................................

Emotional bin... हो बीनच कारण ह्यात सगळं टाकून विसरुन जायचं असतं रे सगळं..जगण्याच्या हरेक टप्प्यावर हवी असते रे अशी एक emotinal bin जी त्या क्षणांचे कुठलेही निकष न लावता फक्त ऐकून घेईल आपलं म्हणणं...रडावंसं वाटताना खांदा होईल, मजेत असताना उत्सुर्त टाळी होईल,काळजीतला धीराचा हात होईल अशी bin...मान्य आहे कधीतरी लाथाडलीही जाईल पण नाकारली नाही आणि हो कुठलाही सल्ला न देण्याचा एकअलिखित नियमही असेल ,जमेल तुला? कळतंय रे मला कुठल्याही नात्याच्या पल्याडचं आहे हे आणि त्यामुळेच धूसरही.. म्हणूनच विचारतेय, जमेल तुला अलिप्त राहूनही असं खोलवर रुजणं ? नक्की जमेल का रे तुला कोणातरीसाठी हक्काची emotional bin होणं आयुष्यभरासाठी?

..............................................................................................................................

जितकं खोल खोल शिरावं ह्या मिट्ट काळ्या अंधारात तितकं दरवेळी काहीतरी नवीन गवसतंच....प्रत्येक ठेच नवीन ...

...............................................................................................................................
भर मे महीन्यात अचानक अंधारुन आलेल्या काळ्याभोर संध्याकाळी...ओल्या मातीच्या गंधात...मुसळधार पावसात...ओल्याचिंब पानाफुलात...तू चक्क आठवलाच नाहीस रे मला...अगदी कडाड् वीज चमकली तरी... पावसाच्या मार्यात वारा घुसमटला तरी आणि हो गच्च भरुन आलेलं आभाळ न बरसताच टाळून गेलं तरीही....नाहीच आठवलास रे तू ...बरोबर म्हणाला होतास तू ...वाटलं होतं तेव्हढं कठीण नाहीय हे खरंच.... फक्त ओसरलेल्या पावसानंतर पानापानातून ओघळणार्या थेंबसरींना नाही रे अजून टाळता येत तेव्हढं मात्र सांगून जा....जमेल तुला?
......................................................................................................................................

लिहीणं ,वाचणं ह्यासारख्या व्यक्त होण्याला वयाचं परिमाण का लावावं? म्हणजे तुम्ही लहान असाल (कळत्या वयातही हं..कारण कोणानकोणापेक्षा तुम्ही नेहमीच लहान असतातच) तर तुम्ही हलकं फुलकंच लिहावं/ वाचावं .... जरा काही गंभीर विचार मांडला की अकाली प्रौढत्वाचे लेबल लागलेच म्हणून समजा... असं बंधन का? आणि जर चुकून तुम्ही मोठे असाल अन् चुकून जरा मजेशीर लिहीलं तर लगेच तुम्ही थिल्लर...का बुवा? मुळात तुमचं लिहीणं किंवा वाचणं हे तुमच्या व्यक्तीमत्वाचा फक्त भाग असावा पुर्ण व्यक्तिमत्त्व नाही नं ? मग तरी लोकं निष्कर्षाची घाई का करतात ?

.........................................................................................................................................

बस रडता यायला हवं यार... अगदी मोठ्या मोठ्याने... धाय मोकलून का काय ते...सगळं मोकळं व्हायला हवं वरचेवर ... मोठे झालो नं(वयाने हं ) कि साला हाच लोचा होतो... समजूतदार का काय ते व्हावं लागतं... डर के आगे जीत है वैगरे स्वत:लाच सांगावं लागतं.. पण यार ती भीती असतेच नं मनात कुठेतरी दडवलेली.. लोकांसमोर वाघ असलेले आपण स्वत:समोरच शेळी होऊन जातो रे खरतर .. पण ते अक्सेप्ट करायचं नसतं आपल्याला... सतत बजावत असतो मी वाघ आहे... का? कशासाठी?... स्वत:शीच प्रामाणिक नाही का राहता येत यार..आणि वाईट म्हणजे हे खुपत पण नाही.. कशाचाच फरक पडू नं देण्याची इतकी सवय?...बरं हे झालं भितीचं... पण खूप मेहनत करून..अगदी जी-जान एक करून जेव्हा लढतो नं आपण आणि तरी साला हरतोच ... तेव्हा रे काय होतं... येतं रडायला?हो येतंच.. फक्त ते मान्य करायचं नसतं... लोकांसमोर नाही निदान एकटं असताना तरी? पण नाही... नाहीच रडता येत.. इतके कोरडे झालो तरी कधी रे? बाहेर पडत नाही आणि आत सहन होत नाही... घुसमटतयं.. धुमसतंय आतल्या आत... ज्वालामुखी होत चाललाय रे तुझा ... पण तरी रडायचं मात्र नाहीच ... मोकळं व्हायचचं नाही... हा कसला रे हेका मना तुझा? सांगशील?

........................................................................................................
इतके वर्ष गर्दीला फक्त टाळतच आलीस सखे तू...कोण जाणे नेमकं काय बोचायचं तुला, पणअगदी चार माणसांची सोबतही तुला असह्य व्हायचीच .... स्वतःच्याही नकळत विणत गेलीस तू एक कोष तुझ्याचभोवती...इतका घट्ट कोष की उजेडाची एक तिरीपही तुझ्यापर्यंत पोहचायला एक युग उलटावं लागलं ....नेमकं काय साध्य केलंस नाही विचारणार मी किंवा असं का हेही नाहीच समजून घ्यायचं मला पण तरी एक सांगशील?
एकांत अन् एकटेपणातलं अंतर तुलातरी पार करता आलं का गं?

........................................................................................................................

ध्यानीमनी नसताना अचानक समोर उभा ठाकलेल्या एखाद्या अलवार ओल्या क्षणासारखा होतास..तू ....भिरभिरत्या नजरेने थेट काळजाचा ठाव घेणारा...खोल खोल उतरत धसमुसळेपणाने मनाचा तळ ढवळणारा...अन् कोणाला काही कळायच्या आत,सावरायचाही अवकाश न देता अलगद निसटून गेलेला...तू...त्या क्षणासारखा...कधीही परतून न येणारा तू...

..........................................................................................................................

एकसारखी गर्दी... कसलाच चेहरा मोहरा नसलेली... ओळख नसलेली... अन ह्या भरगच्च गर्दीत चटकन डोळ्यात भरणारा (कि खुपणारा रे)..अगदी माझ्यासारखाच असलेला तू... शारीरिक म्हण किंवा मानसिक म्हण ... परिमाण कुठलेही असलेत तरी odd man outच नं आपण...जगाच्या दृष्टिने.. 
खुपलं का रे तुलाही आपलं हे जगावेगळेपण..एकदातरी ?

...................................................................................................

वेगवेगळ्या फ्रेम्स मधून आयुष्य खरंच वेगळं दिसतं रे...पण त्यासाठी प्रत्येक फ्रेम चाचपडून तर बघायला हवी न...कधी कधी एखादी लहानशी फ्रेमासुद्धा अख्खं जगणं व्यापून शिल्लक उरतेच कि ... हो नं?

.....................................................................................

समांतर रस्त्यांवर चालताना एकमेकांना टाळता येत नाहीच रे तसंही.... मग तरीसुद्धा एकाच मार्गाने एकत्र चालण्याचा हा तुझा अट्टाहास नेमका कशासाठी रे ? पायवाटांचे शाप का तुला माहीत नाही? एकत्र नाही एकापाठोपाठ असावं लागतं रे तिथे, कोणीतरी एक सतत मागे राहणारच...उरलं सुरलं सावरत... नेमकं हेच... हेच नकोय रे मला....फरफटणं...आयुष्यभर.... तुझा पाठलाग करत...अन् तसंही दिसत राहूच रे आपण एकमेकांना.कायम....अगदी नकोनकोसे होईपर्यंत....भेटणं मात्र टाळूयात का रे? दोन समांतर रेषांचा प्रवास सारखा असला तरी शेवट एक नसतो नं...तसंच आहे आपलं...असं समज हवं तर...

.........................................................................................

परवा कोणीतरी म्हणालं मला," काय गं तू पावसाळी पहाट अनुभवतेस..हिवाळ्यातली धुक्यातली पहाट लिहितेस.. मग उन्हाळ्यानेच गं काय घोडं मारलं तुझं? त्यावर पण लिही कि" अन माझ्या लक्षात आलं कि खरच, उन्हाळ्यावर नाहीच लिहिलं कधी... तर उन्हाळा...उन्हाळा म्हणजे सुट्ट्या..उन्हाळा म्हणजे धमाल..मस्ती...उन्हाळा म्हणजे नो अभ्यास नो शाळा ... पण उन्हाळ्यातली पहाट? जे बघितलंच नाही ते लिहीणार तरी कसं हो? नाही म्हणायला लहान असताना गच्चीत झोपायचो तेव्हाची पहाट आठवते थोडी थोडी ती अशी ...रात्री उशीरापर्यंत गप्पा मारता मारता आम्हा बच्चे कंपनीचा कधीतरी २-३ वाजता डोळा लागायचा..वारं तेव्हाही गरमच असायचं...पण दिवसभर आमच्या धुडगुसीला वैतागलेल्या मोठ्या माणसांकडे बघून झोपायचो आम्ही ...मग कधीतरी गाढ झोपेत अलगद एक गार झुळूक जाणवायची... कधी मध्यरात्री उमललेल्या मोगर्याचा मादक गंध तर कधी शेजारच्या आंब्याच्या मोहराचा मधाळ गंध असायचा त्याला... झोप चाळवायला अगदी पुरेसा असायचा तो गंध..तेव्हाही...किलकिल्या डोळ्यांनी वर बघितलं की समोर दिसायचं निळंशार आभाळ...अथांग पसरलेलं...काही क्षण कळायचंच नाही की नेमकं आपण आहोत तरी कुठे...पण आजुबाजूची मोठ्या माणसांची रिकामी अंथरुणं दिसली की समजायचं....पहाट झाली..पहाटे उठले वैगरे नाही कधी पण गच्चीवरचं ते निळं आभाळ निरखत बसायला मजा यायची....डोळे निवायचे त्या रंगात हे मात्र खरं..

........................................................................................................................................................................

अगदी क्वचित...आपल्या अपेक्षेपेक्षा नेमकी विरुध्द प्रतिक्रिया समोरच्याकडून आली कि लगेच त्याला आपल्याला हवं ते लेबलं लावायची किती घाई करतो नं आपण? आणि एकदा का ते लेबलं डकवलं कि चाचपून बघण्याची तसदीही न घेता टाळत जातो समोरच्याला तो ते लेबलं अगदी सार्थ ठरवेपर्यंत...हो नं?

..................................................................................................................................................................................................................

परिघावरचेच असतो रे आपण कायम.. ठाऊकही असतं आपल्याला ते नेहमीच..तरी केंद्राची ओढ काही शमत नाही..ध्येय बदलत जातात ध्यास मात्र पाठ सोडत नाही..गोल गोल फिरत परिक्रमा पुर्ण करत बसतो बस्स..गम्मतच आहे नाही का?

..............................................................................................................................................................................................................

मुसळधार पावसानंतरचं थेंब थेंब निथळणारं घनदाट रान.. गर्द हिरवंगार.. पानापानावर साचलेलं पावसाचं पाणी नजाकतीनं सावरणारं....चूकार चारदोन किरणांना कवडश्यांत खेळवणारं...ओलंचिंब रान .. अश्या ह्या रानातलं एक साधंसं गाव.. जगाशी जोडलेलं तरी आडवाटेवर विसावलेलं.. मोजक्या कौलारु घरांचं .. मातकटलेल्या रस्त्यांचं.. चार पावलांच्या अंगणांचं ... लहानश्या दगडी वृंदावनाचं ... ह्याच गावातलं उतरत्या सांजेच्या पावसाला अनुभवणारं एक घर...कोणाच्यातरी मालकीचं तरी आपल्या हक्काचं.. संधिप्रकाशात न्हालेलं... दूरवरुन येणार्या ग्रामदेवतेच्या मंदिरातल्या घंटानादात तल्लीन झालेलं.. आपल्यातच रमलेलं एक घर..
Dream destination..... ह्यापेक्षा जास्त काही नको

.........................................................................................................................................................................................................................

कई साल पहले किसी अपने ने पुछा था हमे "याद भी है ,कब देखा था आखरी बार आईनेमें अपने आप को रोते हुए? ", बस तभीसे इन होठोंकी मुस्कान आजभी बरकरार है..

..........................................................................................................................................................................................................................
"खूप खूप वर्षांनी आपल्या गावी गेलो कि काय काय ढुंडाळत असते रे नजर... कित्येक वर्षांपूर्वी जपून ठेवलेलं काहीच कसं रे हाताशी लागत नाही... तेच रस्ते, तेच कट्टे, अन त्याच वळणावळणाशी खुणेसाठी पेरलेल्या आठवणी... तरी ओळखीच्या प्रत्येक वळणावरचं अनोळखीपण नव्याने उमललेलं परकेपण सुचवत असतं का रे आपल्याला ? फक्त काही वर्षात..(कि खूप रे?) इतकं कसं रे बदलू शकतं कोणी?"-
"वेशीचं पोरकेपण जपणं उरतं गं फक्त आपल्या हातात..तेच काय ते आपलं.."

.........................................................................................................................................................................................................................

पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?

..........................................................................................................................................................................................................................
नातं म्हणजे नेमकं काय रे? वर्षानुवर्ष एकमेकांसोबत राहणं म्हणजे नातं की आपल्या दोघांत मागच्या कुठल्यातरी एका पिढीतली गुणसुत्र बागडताहेत म्हणून आपलं नातं? नाही नं ..मला काय वाटतं माहीतेय, ऐन गर्दीच्या मध्यात विनाकारण आपण हरवलोय असं सतत वाटत असताना ..आपल्या तिथे असण्याचं नेमक्या कारणांची जाणीव म्हणजे नातं..एखाद्या गोष्टीवर,वस्तूवर ,आणि माणसावर असलेल्या हक्काची जाणीव (जबरजस्ती नाही ) म्हणजे नातं... हो नं?

........................................................................................................................................................................................................................

कधीचे फक्त चाचपडतोय रे एकमेकांना...नेमका शोध कशाचा हेही ठाऊक नसताना नुसता वेध घेतोय... इतके कसे रे गूढ झालोत परस्परांसाठी की किर्र अंधाराची चादर कधी विणली गेली दोघात हेही कळू नये? दिसेनासं झालो नं की कळतं, काही कोडी ही अशी का तयार होतात ते ...चाचपडतच का होइना पण अडकत जातो रे त्या कोड्यात...कधीच न सुटण्यासाठी प्रयत्न करत..आजन्म

.........................................................................................................................................................................................................................

माझ्यातल्या 'मी'ला अंतर्बाह्य बदलून टाकणारी एखादीच घटना घडून गेल्यावर... 'मी' उरते का? माझ्यातल्या 'मी'पणाचा नवा जन्म म्हणजे जून्या माझा मृत्यू होतो का ? मग नेमकी मी कोण? घटनेपुर्वीची की त्यानंतरची..दोघी एकमेकांना अनोळखी की एकाच नाण्याच्या दोन बाजू?
दृष्टीच्या शोधात असणारी successful पण आंधळी Photographer खरी की दृष्टी मिळाल्यावरा हरखलेली पण तरी अस्वस्थ ती खरी ... तत्वासाठी झगडणारा मरणाच्या दारात असूनही doctor नाकारणारा साधूबाबा खरा की एका उत्कट क्षणी स्वतःहून doctorना शरण जाणारा तोच साधू खरा...
एखादी घटना आयुष्य बदलवते.. पण आपण बदलतो अमुलाग्र?

.......................................................................................................................................................................................................................

अख्ख्या जगाला जे सहज विनासायास मिळतं ते आणि नेमकं तेव्हढंच मिळवण्यासाठी आपलं सततचं झगडणं म्हणजेच जगणं असतं का रे?
..................................................................................................................................................

paaus paaus

रात्रीचा हा मुसळधार पाउस नुसता ऐकायचा असतो रे ... मनभर पांघरुन घ्यायची असते त्याची लय.. त्याचे सूर...त्याचे बोल....त्याची कुजबुज...कणकण साठवायचा असतो त्याचा ..श्वासाश्वासात..पण तरी टाळायचं असतं ते फक्त त्याला बघणं...मध्यरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातला व्याकुळलेला पाउस... कुठल्यातरी अनामिक ओढीने घुसमटलेला पाउस... सरळसोट सरीमधे गुंतलेला पाउस...असं म्हणतात की ह्या पावसाच्या डोळ्यात एक वेडा आरसा असतो.. ऐन मध्यरात्री हा पाउस उशाशी आला नं कि म्हणे प्रतिबिंब दिसतं.त्यात .. पावसाचंच .. फक्त मनातल्या पावसाचं ... 

म्हणून म्हट्लं हा पाउस फक्त ऐकायचा.. मनसोक्त... त्याला बघणं मात्र टाळायचं... जमेल तुला?

.....................................................................................................................................................................................................
शोध घ्यायचाच म्हटलं की मग हवं नको सारंच उकरलं जाणार बघ पुन्हा एकदा..ते टाळून कसं चालणार बयो..मागे वळून बघणं म्हणूनच तितकसं सोपं नसतं नं गं..असंख्य वाटा दिसतात पाठमोरं वळताना.. काही वाटांवर अर्थातच असतात आपल्या पायांचे ठसे पण काही टाळलेल्या वाटा आजही खुणावत असतातच नं....त्यांना दुर्लक्षणं जमणार आहे का तुला ? भुतकाळातल्या संदर्भांचा शोध जरुर घे गं तुझ्या आजच्या असण्याचं स्पष्टीकरण आहे त्यात पण जितकं खोल खोल जाशील तितकी तिथेच रुजत जाशील ह्याचं भान मात्र असू दे..

........................................................................................................................................................................................................................

"कसं असतं नं प्रत्येक नात्यात नं एक जण स्थिर हवाच रे... तरच तर दुसरा त्याच्याभोवती नि:संकोच एक नातं विणू शकतो मुक्तपणे... एक comfortable अंतरावर..space म्हणूया हवं तर त्याला....केंद्रबिंदू ते परिघापर्यंतच्या त्रिज्येची space.. हि space तशी बरीच लवचिक रे पण एक क्षण येतोच असा कि जराशी ताणली किंवा सैलावली कि उसवत जातं रे नात्याचं ,वर्तुळ.... सुलगत जातो एक एक बंध... मागे उरल्या वेड्यावाकड्या नागमोडी गुंत्याला मग नातं तरी कसं रे म्हणायचं? म्हणून हवा असतो एक स्थायी कोपरा नेमकं अंतर जपणारा...." ती बोलत होती अविरत... तिच्या त्याच्या नात्यातल्या त्या अचल केंद्राशी...एका श्वासाच्या अंतरावरून...

..........................................................................................................................................................................................................................
काचेच्या त्या पल्याड करकचून बांधलेल्या ढगांच्या उसवणीतून झिरपत असतो अखंड पाउस... खिडकीवर, छपरांवर..पानांवर फांद्यांवर पसरल्या असतात असंख्य वेड्या ओंजळी... पाउस झेलणार्या...अन् काचेच्या ह्या पल्याड धूरकटल्या खिडकीत विणलं जात असते एक नातं माझं ...तूझ्यातल्या पावसाशी...एक सुलट एक उलट..नव्या वीणीचे नवीन नाते..पावसाच्या साक्षीने

.........................................................................................................................................................................................................................

काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...

......................................................................................................................................................................................................................