Saturday, September 27, 2014

अधमरीसी आँखोंतले पनपते अनगिनत जिंदादिल ख्वाब,,.. कुछ तो अधुरा रह गया हैं शायद है ना?
................................
ओळखीच्या पुढे पण नात्याच्या अल्याड घुटमळलेल्या एका नव्या  वळणावरचे  जुनेच आपण …. तसं तर मागे वळून पुन्हा ते अनोळखीपणा ही नकोय अन पुढे सरसावायचा धीर येईल इतका विश्वासही नाही अजून आपल्यात हो नं ….असं कसं हे  विचित्र अवघडलेपण वागवत रोज नव्याने  सामोरं जातोय नं आपण…. तरी हे वळण सरावं असं मात्र  वाटत नाहीये ….एक  मैलाचा दगड असावं असं वाटतंय हे वळण… यदाकदाचित पुढे नातं गुंफलं गेलंच नं तर पुन्हा कधीतरी मागे वळून बघताना हाताशी येणार्या काही खास क्षणांना जपून ठेवणारं हे हळवं वळण… विसावू का रे इथे… क्षणभर
.................................................
प्रवास म्हटलं की सोबत आलीच...अन् सोबत म्हटली की गुंतणं आलं..मग ह्या गुंत्याला नात्याचं नाव आलं..नातं म्हटलं की अपेक्षा आल्या..अपेक्षाभंग आला.. तुटणं आलं.. सगळा
प्रवास एकट्यानेच केला तर नाही का रे चालणार?

....................................................................
अंधार चाचपडायला लावतो अन् प्रकाश समोर उभं करतो हे "मी"पणाचे कोंदण
......................................................
स्वप्नांचं नं एक वय असतं.. कधी काही क्षणांचं तर कधी काही जन्मांचं सुद्धा.. तुला माहीतेय काही स्वप्न तर अगदी गर्भातच जीव सोडतात.. पण म्हणून स्वप्नं बघायचीच नाहीत असं तर नाही नं ?
.....................................................

किती किती ठिकाणी उसवलेलो असतो रे आपण, एकही जागा एकसंध नाही... निमित्ताला कधी एक साधा ओरखडा तर कधी एखादाच पण जीवाघेणा वार...उसवून जातो खोलवरचं सारं काही.. घट्ट आवळून जपलेलं..आपल्याही नकळत मग पाझरत जातो आपण त्या लहानमोठ्या उसवणीतून.. रिते होत जातो..कोणाला कळेल न कळेल ह्या बेताने... पण कळतंच काहींना..हे उसवणं ..पाझरणं..सावरणं.. अन् सुरु होतो अट्टाहास ह्या उसवणी झाकण्याचा ..त्याच बेढब ठिगळांनी वरवर सारं सांधायचा.. जमेल का रे?
की पुन्हा एक नवा जन्म नवा सोहळा.. उसवण्याचा.. पाझरण्याचा.. सावरण्याचा....

.......................
दोन तीरांवर दोघे आपण... तरी रोज भेटतो रे .. नाही स्वप्न वैगरे नसतं ते..तू असण्याची खात्री असते..तासंतास बोलूनही तुझ्यावर न लादलं जाण्याची..रिती होत जाते रे रोज नव्याने.. पुन्हा पुन्हा भरुन येण्यासाठी..तुला जाणवत असतं रे न सांगितलेलंही.. न घडलेलंही..आपल्या नात्याला नाव नको म्हणायचे ते याचसाठी.. निरागसता कुठल्या रे नात्यात गुंफायची.. असेच राहूया का अनामिक
.......................................
जरा निवांत झालो की एकेक बोच कशी लख्ख होत जाते...उजळून निघते... अगदी जुन्या पुराण्या संदर्भासहीत... मग आपल्याही नकळत देत जातं मन स्पष्टीकरण ,त्या प्रत्येक घावाला गोंजारण्याचं ... त्याला कुरवाळण्याचं... त्रास तर तेव्हाही होतच असतो नं , हव्याहव्याश्या संदर्भात नको ते गुंफलं जात असताना...उघडा होत असतो एकेक सल आठवणींना लगडलेला... कधी सुखावणारा,.. तर कधी....जीवघेणा...गुंतलो होतो एकमेकात तेव्हा नव्हतं का रे असं काही,..सुटी झाले अन् रिती झाले बघ अशी
..............................................
सांज, संध्याकाळ, मावळण काहीही म्हटलं तरी फारसा फरक काही पडत नाही.... उरात अनामिक हुरहुर अन् डोळ्यात खळ्ळकन पाणी हे नातं आजही बदलत नाही .... गर्भार रात्र अजूनही तशीच वांझोटी स्वप्न ओटीत रुजवून वेशीवर अवघडलेली अन् दिवसाची काही देणी आजही न फेडता आलेली....ह्या दोन्हींमधली ही मावळण टाळायला सांग नेमकं कोणाचं असणं लांबवू?
...............................................
कधीतरी अशीच गर्दीतुन चालता चालता त्याच्याशी टक्कर झाली..ओशाळं हसू देउन पावलांची नजरानजर झाली...लक्षात राहण्यासारखा चेहरा नव्हता तसा पण हो दिलखुलास हसू होतं त्याच्याकडे..ते तेव्हढं अचूक लक्षात राहीलं..त्याने जोडलेल्या प्रत्येक नात्याचा TRP असलेलं हे मनमोकळं हास्य..खरतरं तिथेच जिंकलं होतं त्याने..मैत्री व्हायला ओळख वैगरे सोपस्कार त्याच्यासाठी नव्हतेच कधी.. योगायोगाने नव्हे तर ठरवून भेटत राहीला तो..क्वचितच कारणाने.. निखळ गप्पा हेच काय ते कारण... एक दिवस तुझ्यासोबत तो आला.. तुझा मित्र म्हणून ओळख झाली..अन् माझी मैत्रीण म्हणून..सुरवातीच्या अवघडालेपणातून दोघंही गप्पच.. तू मात्र आखंड वाहता.. आम्हाला ओढलंसंच.. बघता बघता आमच्यातही जन्माला आलंच नातं.. अन् गूंतत गेलो त्यातच.. इतकं की तूझं आलगद आमच्यातून बाजूला जाणं जाणवलंही नाही.. नाही तू होतासच आजूबाजूला..नवी नाती विणत..तरी कळण्याइतपत अंतरावर... का हे असं हा प्रश्न मात्र तेव्हा पडलाच नाही.. आजतरी पडतोय का माहीत नाही...हो पण काल पुन्हा जोरदार अडखळले कोणालातरी अन् कानावर ओळखीचं काहीतरी आलं म्हणून हरखले इतकंच
....................................................................
तुला एक सांगू का? बघ हं हसशील नाहीतर ... तू बोलत असतोस नं काहीबाही... महत्वाचं.. बिनमहत्वाचं ..अगदी काहीही.. पण बोलत असतोस नं, तेंव्हाच सुचत असतं बघ मलाही काहीतरी.. सांगण्यासारखं ... न सांगण्यासरखं... अगदी काठोकाठ शिगेवर असतं मन... रितेपणाच्या ओढीत ... पण तरी तुला मात्र थांबवावंसं नाही रे वाटत...तुझा ओघ नाहीच तोडवत...अन नेमकं कसं काय कोण जाणे, 'मी' कळून तू अचानक गप्प होतोस.. अन म्हणतोस... "बोल, ऐकतोय मी.."

आपल्या नात्याला ह्यापेक्षा वेगळं कसं रे मांडायचं... तू म्हणतोस त्याला pure white पण मला मात्र रंगांचे थवे दिसतात त्यात... हरखायला होतं तिथे मला... हरवायला होतं.. कारण खात्री असते तू हरवू देणार नाही ह्याची... मनसोक्त बागडावसं वाटतं.. नाचावंसं वाटतं...गुणगुणावंसं वाटतं.. कशाचीही तमा न बाळगता जगावसं वाटतं... कारण दिल्या घेतल्या श्वासांचा हिशोब आपल्यात कधीच नाही.. तू व्हर्जिन म्हणालास नं ह्या नात्याला... ते असं समजलं मला...

एका अदृश्य अंतरावरून झोकून देतोय दोघाही सर्वस्व ह्या नात्यात.. अंतरं असली तरी सुरक्षिततेची गरज नसलेलं ... आपसूक जपलेलं... तरी एकमेकांना सावरू शकू ह्या विश्वासाचं...

नात्याचं पावित्र्य ह्या विश्वासावरच ठरतं नं रे...
.

Wednesday, September 10, 2014

अधिकार...किंवा सोप्प्या शब्दात ताबा म्हणूयात हवं तर... तो असायला हवं खरंतर..कशावर? मनावर?त्याच्या भरकटण्यावर ,त्याच्या react होण्यावर..अन् त्याच्या असण्यावर...कारण हाच ताबा सुटणं नेहमी अडचणीत आणतं हो नं.. मला माहीतेय तु म्हणशील इतकं का ते सोप्पं आहे? पण वेड्या म्हणूनच तुला जमतंय तितकं जप म्हणतेय..नाहीतर तुझी सोबत आहेच नं.. तोल सुटलेल्या किंवा भरकटलेल्या तुला सावरायला,तुझं तुपण तुझ्या ओंजळीत द्यायला... सोबत त्यासाठीच हवी असते हो नं...
...........................................................................
गुंता जुनाच रे ...अन् ठरल्यासारखं त्याचं स्थिर टोक तुझ्याच हातात..पण मी खुळ्यासारखी खेळत बसते त्या गुंत्याशी..अन् स्वतःच अडकते त्यात...तुझ्यासाठीच सोडवायचं असतं सगळं आणि तरी गुंतवायचं असतं तुला त्यात.. पण बघ नं नाहीच जमलं ते कधी..तु मात्र नेहमीच ह्या गुंत्याबाहेर..खळाळत्या झर्यासारखा..निखळ.. नितळ..प्रवाही..मग तुझा गुंता कसा होणार..काही गोष्टी कधी कळल्याच नाही नं रे मला....
.............................................................................
आठवणीत असं ठरवून नाहीच रे डोकावता येत..ठरवून आठवलं की त्याचा तपशील होतो
...............................................................................
खोल खोल तळाशी पक्क ठाउक असतं आपल्याला आपण कोण ते...आपल्या जगण्याचे नियम तिथे आपणच असतात कोरलेले..अन् इमानेइतबारे आपण ते पाळतही असतो..अगदी न चुकता..पण कुठल्यातरी एका वळणावर ह्या खोल तळाशी लक्कन काहीतरी हलतं..एक झुळूक होऊन कोणीतरी त्या तळाचा ताबा घेतं..आपल्याही नकळत..आपलेच नियम आपल्यापुरतं मग बदलत जातात..त्या झूळकेचा ताल श्वासांची लय ठरवतं..काळजाच्या ठोक्यावरही जाणवतं मग त्याचं अधिराज्य..सवयीची होत जाते ती एक एक खोलवरची जखम अन् त्यावरचा उताराही ...भिनत असतं कोणीतरी रंध्रारंध्रात..हवीहवीशी नशा जणू..ह्या धुंदीवर स्वार होउन मध्यावर येता येता मात्र काचत जातं सगळं..हव्याहव्याश्या उसास्यांचं ठेचाळणं, गुदमरणं..ठरवून टाळलं जातं मग सारं...हवसं..नकोसं..सारंच...तेव्हा कुठे हरवलेल्या त्या मीपणाची जाणीव अचानक लख्ख होत जाते..तळ गाठायची..कोष जपायची घाई होते..अन् खोडलेल्या जून्या नियमांचा खडबड्या स्पर्शावर अलगद नवे मीपण कोरले जाते.
................................................................................
लपाछपीचा खेळ तर सूरुच आहे अव्याहतपणे.. अजूनही..फक्त डाव कोणावर अन् लपतोय कोण कोणापासून हेच कळत नाहीये..की एकच आहेत रे दोघंही..नियतीकडे पाठ करुन आपल्याच नादात म्हणतोय आपण १०,२०,३०...१००..येउ का?आपल्यातच लपलेल्या मीपणाला शोधायला...अन् एका गाफील क्षणाला नियती म्हणते ये..अन् निघतो आपण शोध तसाच अर्धवट टाकून...डाव पुढच्या जन्मावर ढकलून..
...........................................................................
कितनी बार कहा हैं ऐसी बारिश में अपने सारे ख्वाब संभाल के रखा करो...किसी ऐसी जगह जहाँ वो उन्हें छू न सके...बड़ी मिन्नतों के बाद धूप ने चुना था इन्हें..बताया तो था न तुम्हें...अब भला तुम ही बताओं कौन खरीदेंगा ऐसे गिले ख्वाब...सड ही जाएगें न... हरसाल की तरहा... नई फसलों के नये ख्वाब...
.............................................................................
पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?
.........................................................................
अर्धवट असतं सगळं.. रेघोट्यांच्या नात्यांसारखं..धड गुंतताही येत नाही अन् अलगद पाय काढताही येत नाही..हवं तर असतं त्यातलं सगळंच.. प्रेम..ओढ..पण नकोसं असतं ते हवं तेव्हा हवं तिथे तत्पर असणं..
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल
......................................................................................
हातचा घ्यायचा म्हणून बाजूला ठेवलेली नाती हिशोबातून सुटलीच तर रे काय करायचं... उत्तरांची टाळाटाळ... कि प्रश्नांचा फेरविचार...
......................................................................................
पावसाळी रंगाचं भरगच्च आभाळ त्याचा हक्काचा पाउस मिरवत असतं..वरवर सारं शांत शांत...एकसंध... तरी आतून सगळंच हललेलं असतं..अगदी कुठल्याही क्षणी तुटेल आता इतकी कवाडं तटतटलेली....पण आभाळ मात्र तटस्थ..थिजलेलं.. जागच्या जागी..
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ... 

पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो
तनहां सी एक शाम कल रात के मेले में आई थी... सहमीसी घाबरायीसी... जरासी डरी भी थी वो ... पर भला मेले में कोई खुदको कैसे रोक पाये... हा अब अरामानो कि बहोत भीड थी वहा... लेकिन वो देखो वो दूर उस सबसे उंचे झुले के सबसे आखरी मुक़ामसे कुछ परेशानियाँ भी तो झाँक रही थी.. पागल थी बेचारी ... आज नही तो कल उन्हे मिट्टी में तो मिलना ही हैं पता नही उन्हे शायद ...ठीक भी ही... उसके ठीक बगलमें में यादोकी मिठी दुकान जो थीं ... हर एक याद बडी दिलचस्पी से सजाके ..चाशनी में घोले.. इस कडवे मुंहकी मुस्कान बनती ये यादोंकी दुकान ....हाँ हाँ अब जरा संभलके...जरा आगे बधोगे तो सपने मिलेंगे... कहीं कुचल न देना उन्हें कांच के ये रंगीन ख्वाब...नहीं नहीं इन्हे यहाँ तो बेचा नही जाता... हाँ पूजा ज़रूर जाता हैं .. हर सपना यहाँ बेशक़ीमती माना जाता हैं .... इस मेले कि जान ही तो हैं ये सपने... हर और बिखरें ऐसे अनगिनत लम्हे बटोरें जब वो शाम गुजरी यहाँसे तो वो भी भूल गयी अपनी तन्हाई और सुबह कि पहली किरण का हाथ थामे पगली निकाल पड़ी ... नये ख्वाब चुनने .. बस तबसे रातका ये मेला मुस्कराने लगा हैं
......................................................................................
पावसासारखा पाऊस तरी रोज नवा नवा...स्थळाकाळाचे संदर्भ बदलले की पाउसही बदलतो हो नं...ठराविक लयीतली त्याची तीच ती रिपरिप तरी दरवेळी एक नवा सुर गवसतोच अन् निदान त्या क्षणाचा पाऊस तरी वेगळा होऊन जातो नाही का?असा पाउस सखा होणं जमेल का रे तुला ?...
.......................................................................................
जीव विसावण्याचं एक एक ठिकाण काळाच्या ओघात जसंजसं दृष्टीआड होत जातं तसंतसं नकळत insecurity वाढत जाते का रे आपल्या जिवंत असण्याची....
......................................................................................
तु मघा खिडकी म्हणालास नं तर मला माझी गच्ची आठवली..प्रत्येकाची असते नं आपआपल्या घरातली एक खास जागा..तशी ही माझी गच्ची..माझं घर म्हणजे बंगला catagory आहे त्यामुळे छान मोठ्ठ्या गच्चीचं सुख अगदी चालत आलंय.. पण लहान असताना धडपडायच्या भितीने मोठ्यांनी तिकडे जाउ दिलं नाही इतकंच..मोठं होता होता मात्र गच्ची आपली वाटायला लागली..Just college मध्ये जायला लागले तेव्हा ही खर्या अर्थाने भेटली...10 वी 12वी असल्यामुळे अभ्यास अती..अन् त्यामुळे बाहेर फिरायला जाणं व्हायचं नाही मग पावलं आपोआप गच्चीवर वळायची.. नव्याने उमजलेलं तारुण्य,नवीन college..freedom,मैत्रिणी, मित्र(?) gossip.. secrets..First crush , braek up..काय न काय इथे ह्या गच्चीशी share केलंय..कारण काय नं तर तिथे प्रत्युत्तर नसायचं ..प्रतिप्रश्नही नसायचे..खरंतर insecurityचा काळ होता तो..सुरवंटाचं फूलपाखरु होण्याचा..तो ह्या गच्चीने जपला...माझी स्वप्नं जपली..मला जपलं..त्या वयात जे कोणालाच सांगता येत नाही ते सारं ह्या गच्चीने ऐकलं..
आजही इथे घरी आली की मी काही नं काही निमित्ताने जाते गच्चीवर..तिच्या कठड्यावर हात फिरवला नं की काहीतरी जाणवतं खास... तसं तिला सांगण्यासारखं अजूनही आहेच बरंच काही..

............................................................................
रात्रीच्या मिट्ट अंधारात.. दूर दूर... गावा गावांचे सारे संदर्भ जिथे संपतात, तिथे चोरुन भेटतं म्हणे ते आभाळ ह्या जमिनीला.. कशासाठी??चांदण्यांच्या लिलावासाठी..चंद्राच्या उधारीसाठी...अन् असं बर्याच कशाकशासाठी..स्वप्न वैगरेच्याही पल्याडचं जे असतं नं बहुतेक त्यासाठी...असण्या नसण्याच्या सीमेवरचं.. शेवटी काय तर अंधाराच्या ह्या व्यवहारासाठी अवसेची एक रात्र पुन्हा एकदा गहाण.. ठरल्याप्रमाणे..,
.......................................................................................
रडणार्याला खांदा देण्याची किती घाई असते नं लोकांना... आपण स्वत: भलेही किती का हळव्या नाजूक मनाचे असो, कोणी आधार शोधायला आलं कि लगेच आपला खांदा पुढे... सवय होत जाते रे मग असं वरवरचं strong असण्याची... सगळं आहे तसं सहन करण्याची नशा चढत जाते... आपल्याही नकळत मग हे लोकांनी आपल्याकडे आधार म्हणून बघणं, आपल्याशी सगळे problem share करणं हवहवंसं वाटायला लागतं.... पण एक दिवस.. फक्त एक दिवस असाही येतोच नं, जेव्हा आपल्यालाही हवं असतं कोणीतरी...काहीतरी भयंकर उलथापालथ झाली असते तळाशी... अन सावरायला कोणीतरी हवं असतं... तेव्हा रे काय करायचं? आधारवडाचा आधार कोणी होतं का रे?