रारंगढांग...उंचच उंच, आभाळाला भेदणारा नितळ अवाढव्य कातळ....ह्या हिमालयातल्या रारंगढांगातुन रस्ताबांधणीची कथा म्हणजे रारंगढांगाची कथा... पाहिलं तर साधं सोपं अन पाहीलं तर प्रचंड गुंतागुंत.. हिमालय म्हटलं की, पांढर्या बर्फाने आच्छादलेले शिखर, रो रो आवाज करत वाहणार्या नद्या, अप्रतिम सौंदर्याने नटलेला परिसर, पण हिमालय म्हणजे अजुन बरंच काही .. सततची बदलती हवा, क्षणाक्षणला रंग बदलता लहरी निसर्ग, जीवघेण्या दर्या हा सुद्धा हिमालयच...ह्या अश्या टोकाच्या बदलांचा मानवी मनावर होणारा परीणाम म्हणजे रारंगढांग.. अन ह्या रारंगढांगाला फोडुन त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द घेऊन ह्या हिमालयात पहिल्यांच आलेला एक सिविलियन ओफ़िसर विश्वनाथ ह्या कथेचा नायक.. सैन्याची शिस्त, अधिकारांची अरेरावी, दरिद्री पण प्रामाणिक तिबेटी कामगार , बेभरवश्या निसर्गाची भीती..सगळ्यांवर मात करत काम पुर्ण करण्याची कहाणी म्हणजे रारंगढांग.. पण ह्या व्यतिरिक्त राहतच काहीतरी, ग्यानचंद म्हणतो तसं " साब ,जब आदमी मर जाता है तो उस का क्या रहता है?... त्या माणसांची राहते फक्त यादगारी.. रस्त्याच्या कडेला फक्त एक सफेद चौथरा..ह्या एका फर्लांगात असे किती तरी चौथरे दिसतील साब..साब हम इतने भी बुजदिल नही। जंग हम ने भी देखी है... पण साहेब लढाईत समोरच्याच्या हातात बंदुक असते तशी आपल्या ही हातात असतेच नं तो तरी मरेल कीवा आपण तरी, पण...पण इथे तर रोजचीच लढाई.. कुठल्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं... कुठुन तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल , बसल्या जागी खेळ खल्लास.. दरडीचं कोसळणं , लण्ड स्लाईड, ब्रेक फ़ेल..काहीही होउ शकतं... एखाद्या वळणावर म्रुत्यु तुमची वाट बघत उभा असेल..पटकन गाडीत चढेल, तुमच्या बाजुला बसेल ,काहीवेळ प्रवास चालु राहिल अन पटकन तो म्हणेल," चलो दोस्त, टाईम खत्म हो गया" आणि मग काय उरतं मागे? चबुतरा...सतलजच्या काठाशी?"
No comments:
Post a Comment