Thursday, November 13, 2014

अंधाराचं साम्राज्य सुरु होण्याआधी अन् प्रकाशाचा खेळ संपल्यानंतरची उष्टावलेली वेळ.. मावळतीची.. का कोण जाणे संध्याकाळ कधी कोरी वाटत नाही.. कोणा अज्ञाताच्या पावलांचे ठसे सतत जाणवत राहातात पण दिसत मात्र नाही... तरी सुरु होतो शोध... अदृश्य पाऊलवाटेवरचा..
...........................................................
आडूनआडून जाणवणार्या आपल्याच जाणीवा कोणीतरी लख्ख करुन जाव्या अन् जुनेच आपण नव्याने स्वतःला भेटावं असं काहीसं
...............................................
स्वतःकडे नेणारा प्रवास नेहमीच इतका त्रासदायक असतो नं..परीघ वाढवण्याच्या नादात टाळलेलं इथेच असतं नं विखुरलेलं..काही सल.. काही दुखरे कोपरे नव्याने खुणावत असतात तर कधी एखादी गोड आठवण अन् एखादाच हळवा क्षण पायाशी घुटमळत असतो... तितकंसं सोपं नसतं नं हे असे बंध तोडणं... आणि चल परतीचे हे सारे दोर कापले नाहीत तरी जितकं आत आत उतरत जाऊ स्वतःमध्ये तितका गर्द काळोख वेढायला लागतोच..एका क्षणाला येउन मात्र हे सारं थांबतं.. बंद दारापुढे हे मीपण ठप्प होतं.. विचारला जातो जाब परतून येण्याचा , जगाने झिडकारण्याचा, हवेहवेसे टाळून येण्याचा... मीपणाचे मौन इथेही कायम... बंद दारापुढे हे अवघडलेलं आजही..परतीचा प्रवास दमवतो खरा...
...........................................................
एक सकाळ अशीही स्वतःमध्ये रमलेली..जुन्याच एका सुरामध्ये नव्याने रेंगाळलेली.. एक गिरकी स्वतःभोवती अलगद समेवर नेणारी अन् हळूच चोरटी एक नजर सभोवतालची तंद्री न्याहाळणारी.. खळखळून हसणार्या ह्या क्षणाला हे असं निरागसतेचं मुक्त वरदान...प्रसन्नतेच्या काठावरची ही एक लाडावलेली सकाळ.. अशीही..
................................................
स्वप्नं नं काचेसारखी असतात.. स्वच्छ नितळ.. रंग भरुन बरबटवतो ते आपण... नाजूक असतात बिचारी म्हणून अंधारात दडतात.. आणि आपण मात्र त्यांना प्रकाशाकडे खेचतो.. काय तर म्हणे स्वप्नं जागवायचीत..पुर्ण करायचीत... स्वप्नांना सोसवेल तरी का रे ही फरफट.. जीवघेणी...
.................................................................
एक सुरेल नांदी सतत वाजत असते खोल खोल.. मनाच्या तळाशी..पडदा बाजूला झालेला असतो अन् हवं ते नाटक वठवण्यासाठी मुखवटाही तयार..नव्या नाटकाचे नवे चेहरे नव्या प्रेक्षकांसाठी सज्ज...नांदी मात्र तीच.. Pure..
.....................................................................
वहीमधलं जोडपान...शिवणीवरचं.. अगदी मधोमध...सहज सुटं होणारं..तसा असतो एक दिवस..सहज सुटा सुटा होणारा..मागचे पुढचे संदर्भ नसलेला तरी त्यांच्याच जातकुळीचा...ठराविक रेघोट्यांचा.. क्वचित कोरा कोरा..रंगाचे पंख लावून भिरभिरणारा.. नवे स्वप्न गोंदून घेणारा... स्वच्छंदी दिवस...
............................................................................
रात्रीच्या अंधारात पेरलेल्या गोंडस स्वप्नांचा माग काढत नव्या पाउलवाटा रेखणारी स्वप्नाळू सकाळ
..............................................................
कितीही पारदर्शी असलो तरी दरवेळी तळ गाठता येतोच असं नाही नं..तसचं असतं ओळखीचं..

इथे घरी आले नं की एक मज्जा असते.. म्हणजे पुण्याला,नागपूरला कुठेही असले नं की मी 'रुचिरा कुळकर्णी'असते.. ओळख वैगरे असते का ती माहीत नाही पण इथे यवतमाळला आली नं की मी अचानक फक्त आणि फक्त बाबांची मुलगी असते.. किमान अर्ध शहर तरी त्यांना ओळखतं आणि मला त्यांची मुलगी म्हणूनही..कुठल्याही कामासाठी, खरेदीसाठी बाहेर पडलं की ही जी ओळख देतात नं लोक.. world's best feeling असतं ते.. हीच ओळख जपायची असते नं.. आयुष्यभर लहानच असल्याची जाणीव करुन देणारी ओळख...
.................................................................
रोज नवीन अनुभव..रोज नवीन भेटीगाठी.. रोजचा दिवस तसाही नवीन असतोच नं.. तरी एखादा दिवस असाही असतो स्वतःला तपासून बघण्याचा.. एखाद्या प्रसंगाला, व्यक्तीला , अडचणीला किंवा आनंदी सोहळ्याला आपण कसं सामोरं जातो हे आपल्याही नकळत आपण तपासत असतो.. काही तर्क आपले आपणच बांधलेले आपल्याच वागण्याचे.. कधी चुकतात अडखळतात.. पण जेव्हा अगदी बरोबर येतात नं तेव्हा जग जिंकल्यासारखं वाटतं.. स्वतःवर पुन्हा स्वतःचा ताबा मिळवल्यासारखं..किंवा एखाद्या परीक्षेत पहीलं आल्यासारखं... :) :)... Some surprises are too good and life is full of them
................................................................
कुणासाठी तरी हक्काचं एक आभाळ होता यावं ह्यासारखं भाग्य नाही... निळंभोर आभाळ.. कुठेही असलीस तरी मी असेलच.. ताठ मानेने वर बघ मी आहेच हा दिलासा देणारं... जरा उदास असता पिंजारल्या ढगांचे चित्रविचित्र आकार बनवून खळखळून हसवणारं...हो कधीतरी भरुनही येणारं आणि पावसाची सोबत देत त्यात मोकळं करणारं काळंभोर आभाळ.. प्रत्येक छटा निराळी प्रत्येक अदा निराळी असणारं.. कवेत घेता न येणारं तरी मनात साठवलेलं आभाळ... हक्काचं
.................................................................
विझणं असं अचानक नसतं कधीच.. Process असते ती एक.. कधी स्वतःलाच उमगलेली तर कधी लादली गेलेली... अविरत धगधगणारं अग्निहोत्र होणं नसतंच सगळ्यांच्या नशीबी पण विझणं मात्र टळत नाही.. एक ठिणगी तशी असतेच कायम.. पेटलेली..पण प्रत्येकीचाच वणवा नाही नं होत.. प्रत्येकीचं वेगळेपण अधोरेखित करतोच हा वणवा.. हो पण हे विझणं मात्र समान पातळीवर आणतं सगळ्यांनाच.. म्हटलं नं process असते ती.. दुर्लक्ष ही सुरुवात असणारी
...................................................................
जीव लावणं... किती विचित्र असतो नं हा प्रकार.. ओळख, सवय, नातं.. एकेक टप्पा पार करत करत अलगद जीव जडण्याचा हा टप्पा कधी पार होतो कळतही नाही नं.. हे खरं pure..व्हर्जिन.. भौतिकतेच्या नियमांच्या पार गेलेलं.. स्वत्वाचीही अपेक्षा नसलेलं.. जीव लावणं..जीव गुंतणं..
.............................................................
ह्या मातकट पायवाटा नं भरकटणार्याच असतात.. चकव्यासारख्या.. मागे वळून जुन्या खुणा चाचपडाव्या तर रस्ता रेंगाळतो अन् नव्या स्वप्नांच्या गंधाचा माग ठेवावा तर हमखास चुकामुक... गंधाळल्या वाटांचे मोह तसेही बरे नाही रे.
............................................................

" आजकालच्या घरांना उंबरा का नसतो गं.. दाराशी आलेला कोणीही आगंतूक सरळ माजघरात डोकावलेला नाही आवडत मला. चार भिंतीतला गोंधळ असा जगाला दाखवू नये कोणी.." तिचे पाणीदार पण काजळरेष हरवलेले डोळे टाळत बोलत होता तो..
...........................................................
सकाळची कोवळी उन्हं नं मला एखाद्या अल्लड मुलीसारखी वाटतात.. सळसळती..उत्साही ...,दुपार होता होता मात्र उन्हं सवाष्ण होतात... तेजस्वी.. अन् मावळतीला.. मावळतीला हीच उन्हं गरत्या प्रौढेगत भासतात.. समजूतदार थकवा ल्यालेली..
पण ग्रहणकाळातली उन्हं बघितलीस तू कधी? मला नं एका वेश्येसारखी वाटतात ती.. काळ्या सुर्यबिंबाच्या आड लपलेली.. अस्पृश्य.. अख्ख्या जगाने टाळलेली तरी चोरुन बघितली जाणारी ग्रहणातली उष्टी उन्हं ...
............................................................
साखरझोपेतले अस्पष्ट भास .. अन् चाहूलींच्या जाळ्यातून अलवार बिलगलेली ती नेमकी चाहूल....इतकी की पापणीवरची थरथरही सुखावून जावी... पहाटेच्या ह्या नितळ क्षणाला अश्या असंख्य आठवणींचे गोड संदर्भ देउन जाणारा ओल्या पापणीवरचा तुझा ओला स्पर्श.. मोरपिशी स्वप्नस्पर्श...
........................................................
अगदी खोलवर रुजलेला तोच जुना सल.. जुनाच.. अजूनही तसाच ठसठसता.. खूप खूप सुखात असलं कि हि अशी काजळाची तीट होऊन जागणारा...लख्ख बोचरा सल..
.............................................................
स्तब्ध तळ्याच्या देहावर उठणार्या अलवार तरंगांसारखंही असतं एक नातं .. एका क्षणी थेट काळजात घुसणारं .. ह्या वलयांना जन्म देणार्या खड्यासारखं .. अन् दुसर्याच क्षणी हे सल शिवत पुर्वरत होणारं ... असून नसल्यासारखं क्षणभंगूर तरंगांचं नातं..
..............................................................
गच्चीवर होते.. अंधारी रात्र.. गच्चीपण त्यातच हरवलेली..माझी गच्ची..एकेक कानाकोपरा ठाउक असलेली माझी सख्खी मैत्रीण.. आणि वर..वर काळंभोर एकसंध आभाळ..नजर जाईल तिथपर्यंत त्याचा काळा रंग एकसारखा.. पण त्याला छेद द्यायला आज आभाळात अजून काही होतं हं.. फटाक्यांची रोषणाई.. रंगबेरंगी प्रकाश.. आधी आवाज अन् त्यापाठोपाठ लख्ख आभाळाचा एक तुकडा.. दिवाळीत काहीच अंधारात राहात नाही नं..
................................................
रोज..हो अगदी रोज नवनव्या प्रकाशात न्हाउन निघत असतो नं आपण.. किती ते प्रकार, किती त्यांचे रंग, हरेकाची आगळी आभा नाही का? तरी .. तरी दिवाळीच्या अंधार्या रात्री एकच पणती अशी काही उजळवते की त्याला तोड नाही..आणि गम्मत माहीतेय त्या इवल्या पणतीला कधी कळलंच नाही अरे तिने नक्की कुठे प्रकाश पेरलाय.. ह्या दिवाळीत किमान एकदा ह्या लहानशा पणतीच्या प्रकाशाने घेशील ओंजळ भरुन? अंधार कदाचित दूर जाईल..
..............................................
दिवाळी.. सण दिव्यांचा..प्रकाशाचा.. आनंदाचा.. नाव असलेल्या नात्यांचा.. नाव नसलेल्या नात्यांसाठीचा..भरभरुन जगणार्या जिवंत मनांचा उत्सव दिवाळी..
........................................
अधिकार...किंवा सोप्प्या शब्दात ताबा म्हणूयात हवं तर... तो असायला हवं खरंतर..कशावर? मनावर?त्याच्या भरकटण्यावर ,त्याच्या react होण्यावर..अन् त्याच्या असण्यावर...कारण हाच ताबा सुटणं नेहमी अडचणीत आणतं हो नं.. मला माहीतेय तु म्हणशील इतकं का ते सोप्पं आहे? पण वेड्या म्हणूनच तुला जमतंय तितकं जप म्हणतेय..नाहीतर माझी सोबत आहेच नं.. तोल सुटलेल्या किंवा भरकटलेल्या तुला सावरायला,तुझं तुपण तुझ्याच ओंजळीत द्यायला... सोबत त्यासाठीच हवी असते हो नं..
........................................................
आपल्या 'असण्याची' कारणं जेव्हा स्वतःलाच द्यावी लागतात नं खरंतर तिथेच संपतं 'मीपण'..
आपली ओळख आता एका अशा वळणावर येउन पोहोचलीय नं की , मला आपलं उगाच वाटायला लागलंय तुला ओळखायला वैगरे लागलीय मी.. तुझ्या असण्याची ,नसण्याची, हसण्याची, रुसाण्याची सवय झालीय म्हणा मला... पण सवय म्हणजे ओळख नाही नं.. माझ्या अश्या बालिश प्रश्नांची..कधी उत्तरांची.. अखंड बडबड्या झर्याची.,,बरेचदा अडखळलेल्या मौनाची (अन् त्यानंतर येणार्या हळव्या हुंकाराची)...तशी सवय तर तुलाही आहेच... पण म्हणून तुही मला ओळखतोस असं नाहीच नं वाटत तुला... मग...
हो पण ह्या वळणावरुन पुढे जाता जाता तु असशील रेंगाळता माझ्यात कायम..ही खात्री असणं एवढीच ओळख पुरेल नं..जन्मभर...
.........................................................................
जगाशी शेकडो नात्यांनी जोडलेलो असतो आपण.. स्वतःशी जोडणारा दुवा कसा रे सांधायचा.
...........................................................................
सोसवेल तेव्हढंच वेडं असावं गं बयो... निसटलेल्या एक एक क्षणाचं हसं व्हायला नाहीतरी वेळ लागत नाहीच हो नं
............................................................
असं पाठीमागून येउन तुला दचकवायचा कितीही प्रयत्न केला नं तरी कसं कोण जाणे तुला चाहूल लागायचीच आणि तुझ्या बंद पापणीवर माझा तळवा धरला की मला जाणवायची ती तुझ्या स्वप्नांची थरथर...तुला सांगू अलिकडे ह्या स्वप्नात नं मला माझा भास व्हायचा अन् त्या जाणीवेसरशी तळवा अलगद मोरपिशी व्हायचा ....तुझ्या पापण्या सोडवताना इथे माझी पापणी नकळत झुकायची अन् वेड्यागत होकारांची गुपितं बंद पापणी बोलून जायची..

नशीबाला असं पाठमोरं गाठू नकोस बयो आजी नेहमी सांगायची...ती असताना काही कळलं नाही अन् आता कळलं तर पुढचं सांगायला तु नाही
..................................................................
गर्भार रात्र वांझोटी स्वप्न रुजवून अशी वेशीवर अवघडलेली अन् दिवसाची देणी अजूनही न फेडता आलेली.... सांग कोणाचं असणं लांबवू?
................................................................
कशाची रे इतकी भीती वाटते तुला? सतत तुझ्या त्या नितळ डोळ्यात काहीतरी लपवण्याचे भाव... नाही म्हणजे काही चोरी-चपाटी नक्कीच नाही..तुझ्यासारख्या पापभीरू जीवाला ते शक्यही नाही म्हणा ..माहितेय मला ते ..पण हे काहीतरी निराळंय...म्हणजे तुझ्यात कोणी डोकावू नये म्हणून नजर चोरल्यासारखं.. तुझ्याही नकळत मिटत जातोस तू तेव्हा... इतकं कि मी तरी तुला खरच ओळखते हे मी माझं मलाच सांगु शकत नाही...सलतं रे ते... ओळख पुसली जाणं..
ऐक नं तुझे हे भीतीचे कोश वाटून घेऊयात का रे?... नव्याने ओळख होईल नं... कदाचित..
ऐकतोय नं??
...............................................................
पुन्हा रात्र.. पुन्हा प्रवास..हा प्रवास नं वाटून घेता येत नाही.. किंबहुना वाटून घ्यायचाच नसतो.. एका रेषेत जाणारे रस्ते अन् त्यावर भराकटणारे मन.. खर्या अर्थाने निवांत.. दिवासा कसं अवतीभवती भुलवणारा परीसर असतो.. रंग असतात आवाज असतात ... पण रात्री? रात्र एकसमान असते.. अंधारी.. नजर जाईल तिथवर एकसंध पसरलेली अन् म्हणूनच मनाला एकवटणारी.. खरंतर अनुभवयाची गोष्ट ही.. सांगूनही न कळणारी.. ठरवूनही वाटून घेता न येणारी... अंधाराची रात्र..
काही गाणी कधीही ऐकली कि काळजात प्रचंड उलथापालथ घडवतात.. काही ठराविक संदर्भ असावेच असा काही अट्टाहास नसतो त्यांचा तरी दरवेळी एक नवा अर्थ लागतो अन आभाळ दाटून येतं..
चिठ्ठी ना कोइ संदेस .. 
हे असच एक गाणं... काहीही न सांगता अचानक कोणी पुढे निघून जाणं अन माघारी उरलेल्याला एक ठसठसता सल देऊन जाणं.. अशक्य घुसमटायला करतं...त्याची जातानाची ती एकमेव आर्त हाक आपल्याला ऐकू कशी आली नाही.. हा जो गिल्ट असतो नं तो कसा बारा सांभाळता येत असेल आयुष्यभर... 
एक आह भरी होगी, हम ने ना सूनी होगी
जाते जाते तुम ने आवाज तो दी होगी 
हर वक्त यही हैं गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए
......................................................................................
स्वप्नं पाहणं कितीही सुंदर आणि हवसं वाटलं तरी बंद पापणी आडची रात्र कायमस्वरूपी नकोच नं.... गोठलेल्या स्वप्नांना वास्तवाचं भान देणारी सकाळ अशी जागं करते आताशा
..........................................................................................
पहाटेच्या ह्या नितळ प्रहरी अवचित जाग येते... आजूबाजूला निरव शांतता अन त्यातच मिसळलेले आरतीचे अस्पष्ट सूर ...हवेत एक ओलसर गंध पारिजात ल्यालेला अन त्याच्या एका झुळूकेसरशी देह नखशीकांत मोहोरलेला.. अन् त्या क्षणाची ती हवीशी लाज लेऊन अलगद कुशीवर वळणार तितक्यात जाणवलेलं तुझं अस्तित्व.. मला बिलगलेलं... त्या घटकेची निरागस शांतता तुझ्या चेहऱ्यावर दाटलेली... विस्कटलेल्या केसांच्या आडून कपाळावर एक समाधानी रेघ ओढलेली.. बंद पापणीमागे असंख्य स्वप्नांची चलबिचल अन कोण जाणे कशाने पण ओठांवर उमललेलं अस्फुट हसू... ह्या क्षणाचा तू वेगळाच असतो रे.. लख्ख आरशासारखा तरी दरवेळी नव्याने उलगडणारा... 
पहाटेच्या ह्या भारावल्या क्षणाची एकदा द्रुष्ट काढावी का रे?
...............................................................................................
नुकत्याच न्हालेल्या नितळ शुभ्र डोळ्यांच्या पाणीदार किनारी काजळाची दाट रेघ ओढताना आताशा जाणवते एक अनामिक थरथर... पापणीच्या पल्याडच्या स्वप्नांच्या गावाला कोणी काजळाची वेस घालावी तसा हुरहुरतो जीव... अन नेमकं त्याच वेळी आराश्या मधल्या माझ्याच प्रतिबिंबात मला तुझा भास होतो.... इतका जवळून असतो तो आभास कि.. एका क्षणी लक्कन चुकतो ठोका.. खोल काळजाचा.. तुला कळणारा... हो नं.. 

कित्येक दिवसांनी काल पुन्हा काजळ रेखाताना पाणावले रे मी
...............................................................................................
पौर्णिमेच्या रात्री गावाबाहेरच्या त्या रस्त्यालगतच्या माळरानी गेला आहेस का रे कधी? एकात एक गुंतत गेलेली ती सपाट जमीन चांदण्यात न्हाहून निघताना निरखून कधी पाहिलंयस ? हवेत पसरलेला हलका गारवा.. हवाहवासा.. लपेटून घेणारा अन आजूबाजूला पसरलेली ती नीरव शांतता इतकी कि तिला तडा द्यायला झाडाच्या पानांची साधी सळसळ सुद्धा नाही..अवघं वातावरण असं भारलेलं...दैवत्व लाभलेलं... ह्या अश्या माळरानी गवताळ जमिनीच्या कुशीत शिरून हे चांदण्याचं आभाळ मला एकदा तुझ्या डोळ्यात निरखायचं आहे रे..इथे भेट तू ..असाच इतकाच..नेमका