Monday, August 25, 2014

      आठवतंय तुला,माळरानावरच्या त्या आमच्या वाड्याच्या पहील्या मजल्याला एक लहानशी खिडकी होती..आडवे उभे लोखंडी गज लावलेली..पडदा नसलेली..तरी बाहेर रस्त्यावरनं बघितलं की कायम अंधारच दिसायचा तिथे ..अन् आतून तिथे उभं राहीलं की.. बाहेरचं अख्खं माळरान डोळ्यात उतरायचं..हरेक ऋतुतल्या त्याच्या अदा निराळ्या..मोहक...गुंगवून टाकणार्या..उन्हाळ्यातलं पिवळंजर्द ऊन ,हिवाळ्यातलं गुलाबी धुकं..अन् पावसाळा..पावसाळ्यात तर दूरवर पसरलेला त्याचा हिरवा रंग अक्षरशः जादू करायचा...त्या माळरानावरचं काही म्हणजे काही सुटायचं नाही त्या खिडकीच्या नजरेतनं... तासंतास रमायचे तिथे मी... . हरखून जायचे..बाहेरच्या जगापासून अनभिज्ञ...एका अनामिक जादूच्या ग्लानीत..
      भर गर्दीत माझ्या शोधात भिरभिरणारी तरी मला टाळणारी तुझी हळवी नजर बघितली नं की मला हटकून ती खिडकी आठवते..अगदी तुझ्या डोळ्यांसारखीच होती रे ती..गुढ..समोरच्याच्या मनाचा तळ गाठणारी पण स्वतःचा थांगपत्ता कळू न देणारी..


कसंय नं बयो खरंतर आपल्यापुरतंच असतो आपण..आपल्यातलीच गुंतागुंत एव्हढी मोठी असते की सोडवता सोडवता अवघं आयुष्य सरुन जातं..तरी..तरी का गं धडपड आपली कुणा एकात सामावून जायची किंवा उलट कोणाला आपल्यात एकरुप करुन घ्यायची... एकटेपणाची भिती म्हणून..पण ते तरी कुठे नीटसं समजलंय..म्हटलं नं आपल्यातलीच गुंतागुंत मोठ्ठीय फार...

कसला मस्त पाउस सुरुये नाही..अशा पावसाळी दिवसात कुठल्यातरी आडवाटेला असलेल्या माळरानाआडच्या खोल खोल दरीत गेलाय कधी...वर वर दिसतं तिथे सगळं शांत पण असतं तितकंच अस्थिर... हो पण तिथे भय नसतं रे निसरड्या वाटांचं...किंवा शेवाळल्या आधाराचं...आणि आंधळ्या धुक्याचं?..किंवा पागोळ्यांच्या सरींचं??? नाही भीती नसतेच तिथे...असतो तो आजूबाजूला भारलेला हिरवागर्द प्रकाश अन् मनात हळुवार झिरपत जाणारी एकाग्र शांतता.....एव्हढंच काय ते तिथे आपल्या उण्यापुर्या साथीला..एकटंच असावं तिथे खरतरं अन् स्वीकारावं आव्हान मनाला सावरण्याचं..समोरचं काही दिसत नाही म्हटल्यावर मागे न वळण्याचं... सुरुवातीला नाही जमणार कदाचित..गोंधळ उडेल तुझा ..कसल्यातरी अदृश्य धुक्याच्या गर्दीत तू घुसमटशीलसुद्धा... पण तरी रेंगाळशील मात्र तिथेच...खात्री आहे मला... हो कारण अशा प्रत्येक खोल दरीत हमखास असते अशी एक जागा जिथे सहज सोपं पोहचता येतं..परतून येणं मात्र तितकाच अवघड...जीव अडकून पडावा अशी लावून दरी...
तुझ्या माझ्या नात्यातली दरी अशी नाही का रे ?


खुप खुप दिवसांनी अचानक तुझा फोन येतो..मी कामाच्या रगाड्यात गुंगलेले अन् तु..तु माझ्यात(हो नं?)..किती किती बोलायचं असतं इतक्या दिवसाचं साचलेलं...तरी..तरी नेहमीच सुरुवात होते ती "पाउस आहे का गं तुमच्याकडे"ह्या tricky प्रश्नाने.. नाही म्हणावं तर माझ्या आवाजातला गहीवर खरं सांगून जातो अन् हो म्हणावं तर तुझा कोरडा आवंढा मला उसवून जातो..मग टाळतेच मी ते हवामानाचे अंदाज अन् घसरते आपल्या पुढच्या topic वर...विचारत बसते घरचे हाल-हवाल..आई बाबा, दादा वहीनी,छोट्या..अगदी शेजारपाजारचीसुद्धा चौकशी होते..वेळ काढुपणा दोघांचाही...सण वार, जन्म मृत्यू..कोणाची परीक्षा अन् कोणाचे निकाल..काय काय विचारात बसतो..जे विचारायचं असतं ते शिताफीने टाळून.. तू कसा आहेस हा प्रश्नहि शेवटी त्यातच विरुन जातो..उत्तर माहित असलं तरी प्रश्न असतोच नं रे...एकेक करत सगळे विषय संपतातच शेवटी..आणि उरते नेहमीची निरोपाची स्तब्धता...न आवडणारी...पलिकडून येणार्या आवाजाचा वेध घेत, ठेवावा आता फोन म्हणत दोघंही शांत होतो...किती वेळ कोण जाणे दोघंही तिथेच असतो तसेच आजमावत ..अंदाज घेत..खरंखुरं बोलणं तिथे आत्ता कुठे सुरु होतं असतं ..शेवटाकडे सुरु होणारं मौनाचं नवं संभाषण तिथेच रुजू होतं असतं..लक्षात येतंय नं तुझ्या?

No comments:

Post a Comment