Sunday, October 11, 2015

मित्रा,
हि दिवेलागणीची वेळ आणि रिमझिमता पाउस.. संततधार.. उसंत अशी नाहीच.. तसंही कलत्या दिवसाबरोबर थांबायला तो तुझ्या-माझ्यासारखा चाकरमानी नाही नं..तो मुक्त.. मोकळा.. स्वत:च्या धुंदीत हरवलेला..आपली मात्र धांदल.. सांज आणि पाउस ह्या दोघा साख्यंचा मनासारखा मेळ घालायची धांदल...दिवसभराच्या कामाने शिणलेला देह अन पावसाच्या ओल्याचिंब स्पर्शाने फुललेलं मन.. कशी रे सांगड घालायची? .. ह्या अश्या गडबडीत हे मन नं गावाची वाट पकडतं..
अशा पावसात हटकून गावाकडची संध्याकाळ आठवते.. आषाढ लागला नं कि अचानक एक दिवस संपर्क तुटायचा गावाचा... हे चार महिने गाव म्हणजे स्वत:तच मिटलेल एक स्वप्नं असावं... हिरवंगार स्वप्न.. अन अख्खं गाव ह्या स्वप्नात रमलेलं.. जो तो घरात बंद..कारण बाहेर पडायचं म्हटलं तरी पावसाचा हा पडदा कोणं नं बाजूला सारणार? संध्याकाळ मात्र हे धाडस करायची..वेशीवर उभ्या दिवसाला ओलांडून सांज अंगणात यायची..उंबरठ्यावरून हाक मारत रात्र ओटीत ठेवायची..नेहमीची कलतीची सोनसळी उन्हं नसायची म्हणा सोबतीला, पण न चुकता एखादी लख्ख वीज मात्र देऊन जायची.. इवल्या रात्रीला सोबत म्हणून... देवघरात तेवणाऱ्या मंद नंदादीपाच्या प्रकाशात मग पावसाची सर न सर उजळून निघायची.. आणि शुभांकरोतीच्या सुरात हि सांजवेळ नकळत पसार व्हायची..
मिट्ट काळोख्या रात्री मनभर ऐकलेला तो गावातला पाउस कधी शहरात आलाच नाही रे..
बयो, 
संवाद साधायचा असतो की नकळत साधला जातो? म्हणजे बघ नं वर्षानुवर्षं गप्प तू अन अख्ख्या जगाची अखंड बडबड सोबतीला घेऊन वणवण भटकणारी मी.. आपल्यात संवाद आहे का गं ? स्पर्शाला भाषा नसते म्हणतात तसं संवादाचंही असतं नाही का? .. मौन हासुद्धा संवाद असतोच नं.. अन ह्या मौनाची जी भाषांतरं होतात तो संवाद तर निव्वळ विलक्षण...
. बयो, मृत्युशी घडलाय कधी संवाद तुझा? अशी हसतेय काय ? त्याच्या इतका बोलका जन्मही नसतो गं.. वेळोवेळी खुणावणारा, तरी चकवणारा मृत्यू सतत जाणीव करून देत असतो, सांगत असतो 'मी आहे बरं का' .. त्याचं बोलावणं येईल म्हणून तर इतकं घाईत जगत असतो नं आपण..
. बयो वेग हवा गं जगण्याला.. शक्य तितकं अनुभवता आलं पाहिजे.. जगता आलं पाहिजे.. नाहीतर श्वास घेण्यातच सरायचा अख्खा जन्म...
. ह्या जगण्याशी अन पर्यायाने आपल्यातल्या स्वतःशी हरवलेला संवाद नव्याने सांधायचा का गं ?
बयो,
सगळं कसं स्तब्ध... हे भरून आलेलं आभाळ, एकसुरी पाउस,वाहणं विसरलेला वारा, तेच शहर, तीच घरं, तेच रस्ते अन तीच माणसं.. सगळं तेच.. वर्षानुवर्ष जिथल्या तिथे... कशातच बदल नाही... सवयीचं झालंय आताशा पण तरी एक अस्वस्थता मनात घर करून बसलीय.. आणि त्यात भर म्हणजे कानात रुंजी घालणारं हे गाणं.. 'दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है'... कारणं कळायला हवीत गं.. ह्या अस्वस्थतेची.. ह्या रितेपणाची.. कारणं ह्या जाणिवांची... नाहीतर हे असं नुसतं वेळी अवेळी पाणावणं काही बरं नाही.. खूप जुन्या ओळखीच्या डोळ्यात अनोळखीपण कसं काळजाला हात घालतं तसं काहीसं हे...
बयो, जीव कसा गं जडतो? सवयीतून? सोबतीतून? कि कोणीतरी अगदी आपल्यासारखं असतं, त्या त्याच्या /तिच्या असण्यावर जीव जडतो? हि जाणीवच मुळात विलक्षण असावी नं.. सुखावणारी... मालकी हक्क सांगणारी.. पण मग हक्क संपल्यावर ही जाणीवही विरायला हवी नं... हम्म.. तसं होत नाही .... बरोबर नं..
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर यह हंगामा ए खुदा क्या है?
वेस हरवल्या गावासारखा भरगच्च प्रांत हा.. रोज नव्या जाणीवेचं नवं घरटं .. अन जुन्या जाणिवेकडे दुर्लक्ष....
पण जाणीवा मरत नाही गं.. गोठतात फार तर.. तुझ्या माझ्यात गोठ्ल्यात तशा.. अन म्हणूनच हे जाणीवांचं अस्वस्थपण मिरवत आपल्यातलं जिवंतपण म्हणतंय

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है?
आख़िर इस दर्द की दवा क्या है?
बयो, 
संवाद साधायचा असतो की नकळत साधला जातो? म्हणजे बघ नं वर्षानुवर्षं गप्प तू अन अख्ख्या जगाची अखंड बडबड सोबतीला घेऊन वणवण भटकणारी मी.. आपल्यात संवाद आहे का गं ? स्पर्शाला भाषा नसते म्हणतात तसं संवादाचंही असतं नाही का? .. मौन हासुद्धा संवाद असतोच नं.. अन ह्या मौनाची जी भाषांतरं होतात तो संवाद तर निव्वळ विलक्षण...
. बयो, मृत्युशी घडलाय कधी संवाद तुझा? अशी हसतेय काय ? त्याच्या इतका बोलका जन्मही नसतो गं.. वेळोवेळी खुणावणारा, तरी चकवणारा मृत्यू सतत जाणीव करून देत असतो, सांगत असतो 'मी आहे बरं का' .. त्याचं बोलावणं येईल म्हणून तर इतकं घाईत जगत असतो नं आपण..
. बयो वेग हवा गं जगण्याला.. शक्य तितकं अनुभवता आलं पाहिजे.. जगता आलं पाहिजे.. नाहीतर श्वास घेण्यातच सरायचा अख्खा जन्म...
. ह्या जगण्याशी अन पर्यायाने आपल्यातल्या स्वतःशी हरवलेला संवाद नव्याने सांधायचा का गं ?
मित्रा, 
गेला तासभर ह्या एका शब्दाशीच अडखळलेय... लिहावं न लिहावं ह्या कन्फ़ुजन मध्ये...तसंही न लिहिलेलं पोहोचेलच तुझ्यापर्यंत.. हे टाइप करणं काही खरं नाही रे, ओलावा हरवतो... त्यापेक्षा कागदावर उमटलेली थरथरती अक्षरं बरी... काळजात उठलेली कळ ती अक्षरांची धार नेमक्या जागी पोहोचवते ... आता ह्यात कसं नं,मला पोहोचताच येत नाहीये तुझ्यापर्यंत.. 
स्वतःचा स्वतः पर्यंतचा प्रवास दमवतो नं रे... अश्यावेळी प्रत्येकाची रिअक्ट होण्याची पद्धत वेगळीच.. जशी तुझी, कोशात जाण्याची...किमान श्वास घेण्यासाठी एक फट उघडताना समोर मला बघताच क्षणार्धात पुन्हा कोशात गुडूप होणारा तू तसा सवयीचा .. तुझ्या डोक्यातला चिखलही ओळखीचा..तुझा त्रागा ओळखीचा ...अनोळखी फक्त तुझी घालमेल.. तू तुझ्यात असताना माझा माझ्याशी झालेला संवाद तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची माझी अधीरता... अन वाट पहाणं तुझा ओळखीचा तू होण्याची ... सवयीचा तरी दरवेळी नव्याने समृध्द करणारा हा प्रवास तू तुझ्यात परतशील तेंव्हा सांगेल
नक्की

सई


........................................................................................

Sunday, February 1, 2015

दिवसाच्या प्रवासाने दमलेली... भारलेली.. समाधानी सांजवेळ... ओंजळभर उन घेऊन उंबऱ्यात उभी... तिष्ठत.. याचकाच्या वेशात... काय हवं असतं तिला ? रात्रीपुरता आसरा ? कदाचित हो.. पण आसरा तिला स्वतः साठी नाही तर त्या ओंजळभर उन्हासाठी हवा असतो. दिवसभरातले कवडसे वेचून भरलेली ओंजळ तिची तिला निरांजनात रिती करायची असते अन कवड्श्यांनी उजळलेल्या निरंजन ज्योतीत क्षणभर रेंगाळत विरून जायचं असतं रे तिला. पहाटेची स्वप्न पूर्ण करता उंबरठ्याशी ताटकळलेली हिसांज तेवढी न विसरता घरात घे..

दोस्ता ,आपण भेटतो...खूप दिवसांनी खूप बोलतो.. विषय असो नसो.. बोलणं थांबत नाही... अधून मधून डोकावत असते शांतता.. दोन शब्दांमधली... अंदाज घेत असते ती दोघांचा.. दोघांनाही पडलेल्या प्रश्नांचा.. अन वाट बघत असते प्रश्नांच्या उत्तरांचा.. आणि आपण..आपण नेमकं त्यांना विळखा घालून तिथेच आजूबाजूला घुटमळत बसतो. वेळ सरत असते , आपल्या गप्पा अजून रंगत असतात.. पण शेवटी निरोप घ्यायचा असतोच नं...
तुझी पाठ वळण्याच्या नेमक्या क्षणी कसाबसा कुजबुजलेल्या त्या अडखळत्या प्रश्नांची नेटकी उत्तरं तुझ्या आश्वासक नजरेतून गवसायला हा महत्वाचा शेवट गाठावा लागतोच हो नं ?

आज शेवटी एकदाची लायब्ररीची मेंबरशिप क्लोज केली... गेले काही महिने प्रचंड 
बिझी गेलेत.. तरी वाचायला वेळ काढायचाच ह्या जिद्दीने लायब्ररी सुरु 
होतीच..आणि त्याच अट्टाहासाने मीन पुस्तकं पण बदलून आणत होती..पण काल 
पुस्तकांवर धूळ बघितली अन निश्चय केलाच.. तसा तो गेल्या चार महिन्यात दोनदा 
झाला होता हे पण लक्षात आलं.. कसं होतं नं मोठ्या धीराने मी ठरवते कि बस आता 
बंद कराची लायब्ररी.. आई बाबांना वेळ देत येत नाहीये आणि चालली पुस्तकं
वाचायला..सगळं संपवून टाकायचं ह्या रागातच लायब्ररीत पोहोचायचे अन.. तिथे
पोहोचले कि माझा राग मावळायचा.. पुस्तकांचं विश्व.. तो वास.. स्पर्श.. हजारो
पुस्तकं.. त्यांचे वेगवेगळे विषय.. भाषा.. रंग.. मुखपृष्ठ.. आहाहाहा.. खेचून
घ्यायचे स्वत:कडे.. आणि माझा निर्धार.. लायब्ररी बंद करायचा..नकळत गळून
पडायचा..अन मी मेंबरशिप रिन्यू करून मी बाहेर यायचे..
आज मात्र संपवलं सगळं.. अतिशयोक्ती वाटेल कदाचित पण लायब्ररीतून
बाहेर पडताना भरून आलं होतं... मागे वळून एकदा त्या पुस्तकांकडे बघायचा मोह
कसाबसा आवरला मी आणि बाहेर पडले तिथून.. माझ्यातला एक खूप महत्वाचा भाग तिथेच
मागे ठेऊन.. लवकरच परतून येण्यासाठी.. कदाचित...
मोठ्या मोठ्या स्वप्नांची डेड लाईन.. अन लहान लहान स्वप्नांची एक्सपायरी डेट...नेहमीच अदृश....

भर थंडीत गर्द धुक्यापल्याड साठलेलं हे काळंभोर मळभ बघितलं नं कि मला हटकून तू आठवतोस.... खूप खूप दाटून आलेलं असतानाही, कोसळण्यासाठी श्रावणाचं निमित्त शोधणार्या भर ग्रीष्मातल्या वळीव सरीसारखा....

मुरत चाललय गं नातं आता. अवास्तव फापट पसाऱ्यातून नेमकेपणाकडची वाटचाल सुरु झालीय. एकेक टप्पा. अनोळखी.. ओळखी... भीती... अपेक्षा.. विश्वास. ओलांडत जातोय हि एक एक वळणं. सहज होत चाललोय. जाणवतंय नं बयो..

नवीन वर्षाच्या नव्या कोर्या डायरीत पहिल्या पानावर लिहिण्याचा आनंद मला थेट शाळेत घेऊन जातो... स्वतःचं नाव तिथे लिहिताना वळणदार अक्षराचा अगदी कळस गाठला जायचा... आजकाल मात्र सगळं टाईप करण्याचा जमाना... हातात पेन फक्त सही ठोकण्यासाठी.. पण पहिल्या कोऱ्या पानावर लिहिण्याची हौस अजूनही तशीच... वेडं वाकडं अक्षर.. शब्दांवर टोप्या घालायचा कंटाळा... क्ष ज्ञ कसा रे लिहितात... जोडाक्षर लिहिताना तर हमखास मराठीच्या बाई आठवतात. ...ह्यावर्षी नं ओर्गनाइज राहू जरा म्हणत नीट अधोरेखित केलेले मुद्दे नकळत स्वच्छतेचे ५ मार्क देऊन जातात नं तेव्हा जाणवतं....काही सवयी उगाच सुटल्यात.. कधीकाळी ज्या भिनल्या होत्या आपल्यात त्या आता पहिल्या पानापुरतच उरतात. अन डायरीच्या शिल्लक पानांवर नव्या सवयींचे ठसे उमटतात..


नेमिची येतो पावसाळाच्या धर्तीवर नेमिची तर येतं नवीन वर्ष.. त्यात काय एवढं.. 
३६५ दिवस संपले कि झालं.. आलं पुढचं वर्ष.. एक अंक बदलला.. मोठ्ठं काय नं 
त्यात.. पण असं नसतं राजेहो.. इतकं साधं सोपं नसतं ते... आज रात्री १२.०० वाजून पुढे सरकलेला काटा एक अख्खं वर्ष मागे टाकून पुढे निघाला असतो..गम्मत नाही.. काय मिळवलं काय गमावलं वैगरे असू द्या हो पण उणेपुरे ३६५ दिवस आपण चक्क नीट तरून आलो ह्याचं आश्चर्य नाही वाटत ? कौतुक नाही वाटत प्रत्येक दिवस भरभरून जगण्याचं..चांगलं वाईट दुय्यम ठरतं हो अश्यावेळी.. फार लवकर गेलं नं हे वर्ष... असं हटकुन दरवर्षी वाटतं.. बरंच काही राहून गेलेलं असतं तरी जडवलेली झोळी सुखावतेच नं... आपण जसं पाहू तसंच वर्ष दिसतं आपल्याला... समाधान मात्र दरवर्षी वाढतंच. हो नं?

आज नं एक गंमत झाली. सांगू? रोजच्या सारखी मी माझ्या गाडीवर ऑफिसला चालले होते. माझ्याच धुंदीत. मस्त थंडी अन कानात आवडती गाणी. मज्जानी लाईफ. गर्दी नव्हतीच नं. हा तर झालं असं कि एका वळणावर एका बुलेट्ने मला ओवरटेक केलं. त्याचा मालक बुलेटला साजेसाच होता म्हणून मीपण मोठ्या मनाने घाबरून त्याचा ओवरटेक माफ केला . पण इतकं करूनही त्याची बुलेट काही बुंगाट समोर गेली नाही. हळूहळू चालवत होता तो अगदी माझ्या रथासमोर." च्यामारी काय कटकट आहे". असं म्हणत मी गाडी बाजूला घालणार इतक्यात. इतक्यात त्या मालकाच्या हातावरून एक लहानसा चेहरा डोकावला. निरागस अन खट्याळ. कसं हरवलं तुला असा काहीसा भाव. वाकुल्या दाखवत खिदळत होती ती लालचुटुक ड्रेस मधली गोरीपान पोर. आता मात्र मलाही जोर चढला मी स्पीड जर रेज केली आणि प्यारेलल आली तिच्या तर चिमुरडी लगेच बिलगली बापाला. ५मिन असाच खेळ चालला होता. कधी ती पुढे तर कधी मी. ती समोर गेली कि खळखळून हसायची अन मी जरा पुढे गेली कि बापाच्या पोटावर गुद्दे मारत त्याला चीथ्वायची. धमाल मजा. त्यांच्या वळणावर वळताना मात्र गोड हसून बाय केलं लेकीनी एका फ्लाइंग कीस सकट. अन बापानेपण मान वळवत डोळ्यातूनच थ्यांक्स म्हटलं. लेकीसाठी तिचा सुपरम्यान बाबा जिंकला होता अन माझ्या झोळीत एक समाधानी दिवस पडला होता.