Sunday, October 11, 2015

मित्रा,
हि दिवेलागणीची वेळ आणि रिमझिमता पाउस.. संततधार.. उसंत अशी नाहीच.. तसंही कलत्या दिवसाबरोबर थांबायला तो तुझ्या-माझ्यासारखा चाकरमानी नाही नं..तो मुक्त.. मोकळा.. स्वत:च्या धुंदीत हरवलेला..आपली मात्र धांदल.. सांज आणि पाउस ह्या दोघा साख्यंचा मनासारखा मेळ घालायची धांदल...दिवसभराच्या कामाने शिणलेला देह अन पावसाच्या ओल्याचिंब स्पर्शाने फुललेलं मन.. कशी रे सांगड घालायची? .. ह्या अश्या गडबडीत हे मन नं गावाची वाट पकडतं..
अशा पावसात हटकून गावाकडची संध्याकाळ आठवते.. आषाढ लागला नं कि अचानक एक दिवस संपर्क तुटायचा गावाचा... हे चार महिने गाव म्हणजे स्वत:तच मिटलेल एक स्वप्नं असावं... हिरवंगार स्वप्न.. अन अख्खं गाव ह्या स्वप्नात रमलेलं.. जो तो घरात बंद..कारण बाहेर पडायचं म्हटलं तरी पावसाचा हा पडदा कोणं नं बाजूला सारणार? संध्याकाळ मात्र हे धाडस करायची..वेशीवर उभ्या दिवसाला ओलांडून सांज अंगणात यायची..उंबरठ्यावरून हाक मारत रात्र ओटीत ठेवायची..नेहमीची कलतीची सोनसळी उन्हं नसायची म्हणा सोबतीला, पण न चुकता एखादी लख्ख वीज मात्र देऊन जायची.. इवल्या रात्रीला सोबत म्हणून... देवघरात तेवणाऱ्या मंद नंदादीपाच्या प्रकाशात मग पावसाची सर न सर उजळून निघायची.. आणि शुभांकरोतीच्या सुरात हि सांजवेळ नकळत पसार व्हायची..
मिट्ट काळोख्या रात्री मनभर ऐकलेला तो गावातला पाउस कधी शहरात आलाच नाही रे..

No comments:

Post a Comment