Sunday, October 11, 2015

बयो,
सगळं कसं स्तब्ध... हे भरून आलेलं आभाळ, एकसुरी पाउस,वाहणं विसरलेला वारा, तेच शहर, तीच घरं, तेच रस्ते अन तीच माणसं.. सगळं तेच.. वर्षानुवर्ष जिथल्या तिथे... कशातच बदल नाही... सवयीचं झालंय आताशा पण तरी एक अस्वस्थता मनात घर करून बसलीय.. आणि त्यात भर म्हणजे कानात रुंजी घालणारं हे गाणं.. 'दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है'... कारणं कळायला हवीत गं.. ह्या अस्वस्थतेची.. ह्या रितेपणाची.. कारणं ह्या जाणिवांची... नाहीतर हे असं नुसतं वेळी अवेळी पाणावणं काही बरं नाही.. खूप जुन्या ओळखीच्या डोळ्यात अनोळखीपण कसं काळजाला हात घालतं तसं काहीसं हे...
बयो, जीव कसा गं जडतो? सवयीतून? सोबतीतून? कि कोणीतरी अगदी आपल्यासारखं असतं, त्या त्याच्या /तिच्या असण्यावर जीव जडतो? हि जाणीवच मुळात विलक्षण असावी नं.. सुखावणारी... मालकी हक्क सांगणारी.. पण मग हक्क संपल्यावर ही जाणीवही विरायला हवी नं... हम्म.. तसं होत नाही .... बरोबर नं..
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर यह हंगामा ए खुदा क्या है?
वेस हरवल्या गावासारखा भरगच्च प्रांत हा.. रोज नव्या जाणीवेचं नवं घरटं .. अन जुन्या जाणिवेकडे दुर्लक्ष....
पण जाणीवा मरत नाही गं.. गोठतात फार तर.. तुझ्या माझ्यात गोठ्ल्यात तशा.. अन म्हणूनच हे जाणीवांचं अस्वस्थपण मिरवत आपल्यातलं जिवंतपण म्हणतंय

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है?
आख़िर इस दर्द की दवा क्या है?

No comments:

Post a Comment