Sunday, May 6, 2012

सरत्या काळानुसार लोकं बदलतात,त्यांच्यांशी जोडलेली नात्यांची समिकरणं बदलतात... भावना बदलतात... आणि खरच हा बदल एक अविभाज्य भाग बनत जातो आपल्या जगण्याचा..आपण ही सवयीचे गुलाम..स्वीकरतो हे सारे बदल... रोजचाच दिवस उगवतो अन् तसाच मावळतो...आपण पुढे सरकत राहतो..पण अचानक एक दिवस स्वतःलाच स्वतःची ओळख अनोळखी भासते..त्या नेमक्या क्षणाला बदलांची सवय झालेलं आपलं मन हा बदल मात्र स्वीकारायला तयार नसतं... आपल्या आप्तांकडुन जेव्हा ह्या बदलाला नाकारलं जातं तेव्हा खरतरं मुळापासुन हादरतो आपण.. आणि त्याच सुन्न मनस्थितीत विचारत बसतो स्वतःलाच.. नेमकं कुठल्या वळणावर हरवलं ते माझं हवंहवसं मीपण.. खरखुरं.. मुखवट्याशिवायचं... अन् मग सुरु होतो तो हा शोध.. भविष्याच्या वाटेवर चालताना भुतकाळात डोकावुन हरवलेलं गवसतयं का ते शोधायचा अविरत चालणारा खेळ.. तुम्हा आम्हा सार्यांचाच...
व्यक्त होणं..एक गरज बनत चाललीय आताशा... वरवर सारं शांत..पण..आत.. मनाच्या तळाशी एक अशांत खळबळ... एक ज्वालामुखी..कदाचित स्फोटाची वाट बघत.. की तोही असाच शांत होणार कोणाच्याही नकळत.. पुर्वीसारखा.. नाही आता बहुदा नाही तसं होणार..कारण व्यक्त होण जमतय थोडं थोडं... आपल्या प्रत्येकाचं एक माध्यम असतं नं असं व्यक्त व्हायचं... कदाचित तीही एक कलाच असावी.. किंवा कुठल्याही कलेचा मुळ उद्देशच व्यक्त होणं हा असेल.. हं असेल कदाचित.. चला तर मग आपण सारेच व्यक्त होउयात... कधीतरी मुद्दाम बंद केलेली मनाची कवाडं पुन्हा जराशी किलकिली करुन डोकाउ स्वतःच्याच मनात.. नाही दुसर्या कोणाशी पण निदान स्वतःच स्वतःशी तरी बोलुयात.. देउयात एक प्रामाणिक कबुली आजवर घडुन गेलेल्या चुकांची..येउ घातलेल्या आव्हानांची.. आणि कदाचित रात्री अपरात्री अचानक दाटुन आलेल्या भितीचीही.. माध्यम भलेही कुठलेही असो.. पण स्वतःशीच स्वतःचा संवाद सुरु असावा.. हो नं?
जीव लावावा तो तुझ्यासारख्या माणसावरच.... माणसातलं हे हरवत चाललेलं माणुसपण जेव्हा तुझ्या एका नजरेत दिसतं नं तेव्हा वाटतो एक विश्वास..ह्या प्रेतांच्या वस्त्य़ांमध्ये जिवंतपणा शिल्लक असण्याचा.. असंकसं रे सुचतं तुला नेमक्या वेळी नेमकं बोलत नेमकेपणाने नेमक्या व्यक्तीच्या मनात शिरणं..खरं सांगायचं तर तुला एकदा भेटल्यावर तुला विसरणं तसं अशक्यच.. तसंही तुला ओळखायला लागल्यापासुन तुझ्या तनामनात वसलेला तुझा सच्चेपणाच तर तुझी ओळख बनला होता..अन् माझी ओळख?हं..खरयं तुझं..काही नात्यांच्या ओळखीही त्यांच्या नावांप्रमाणे पुसट होत जातात आणि मागे उरतात काही सुगंधी आठवणींचे हळवे ओले ओरखडे.जाउ दे पुन्हा नकोच ते..पण हो जीव लावा तो तुझ्यासारख्या माणसावरच...कारण... कारण हे असलं जीवघेणं नातं तुच पेलु शकतो..तेही अगदी सहजच.. चेहर्यावरची रेषही न बदलता मनातली सारी अखंड वादळं लपवणं तुलाच शक्य...

प्रवासापुर्वीचा प्रवास..

गेल्या आठवड्यात मुंबईला निघाले होते.. बसची वाट बघत बरिचशी गर्दी त्या शिवनेरीच्या थांब्यावर.. बसला तसा उशीर होता म्हणुन माझं सहज आजुबाजुच्या लोकांचं निरिक्षण सुरु होतं..एक पहिल्यांदाच मुंबईला निघालेल्या काकु..थोड्या बावरलेल्या, थोड्या नर्व्हस.. आणि खुप उत्सुक..बाजुलाच बसलेल्या एका अमेरिकन मुलीशी देव जाणे काय काय बोलत होत्या..आणि तीही पठ्ठी कितीसं कळत होतं तिला कोण जाणे?... पण ऐकत होती.. भावनेला भाषा नसते हेच खरं..
दुसरं एक टिपिकल पुणेरी कुटुंब.. नुकतच लग्न झालेली मुलगी... बहुदा पहिल्यांदाच माहेरी आली होती..पुरेपुर माहेरपण उपभोगुन बहुदा मुंबईला पुन्हा सासरी निघाली होती.. तिला यायला जरा उशीरच झाल होता त्यामुळे जरा चिडचिड सुरु होती.. पण नशिबाने तिचीही बस लेट ह.. मग जरा ती निवांत झाली आणि मघाची स्वतःची वागणुक आठवुन स्वतःच खजील झाली..गोंधळली होती..हळुच जाउन आईच्या मिठीत शिरली.. भर गर्दीत त्यांचा हा निरोपसमारंभ मस्तच रंगला ... एकीकडे माहेर सोडण्याची हुरहुर आणि दुसरीकडे सासरची ओढ.. मोठं मजेशीर होतं ते सारं.. माझ्याही नकळत माझ्या बाजुला उभ्या दोन मुलींचं बोलणं माझ्या कानावर आलं.. दोघीपण मुंबईच्या अन् खुप मोडर्न.. ह्या कुठल्या लो-क्लास गर्दीत उभे आहोत आपण असा काहीसा भाव.. जरा मुद्दामच इंग्लिशमध्ये बोलत होत्या नकट्या... त्यांचं ते यु नो वालं इंग्लिश ऐकुन आम्हा सो कोल्ड यंग लोकांची मस्त करमणुक होत होती.. त्यांना हे बहुतेक लक्षात आलचं नाही... तेव्ढ्यात एक बस आली आणि एकच झुंबड उडाली.. जरा गर्दी कमी झाल्यावर माझं लक्ष एका प्रौढ जोडप्या कडे गेलं.. काकु बहुतेक मुंबईला मुलाकडे निघाल्या होत्या आणि काका मात्र पुण्यातच... काकु बसमध्ये बसलेल्या अन् काका खिडकीसमोर... काचा बंद असल्यामुळे त्यांचा मुक संवाद सुरु होता.. काळजी घ्या.. पोहचल्यावर फोन कर... तुम्ही गाडी हळु चालवा.. नीट जेवा.. आणि अजुन बरचं काही.. किंवा त्याहीपलिकडे न बोललेलं बरचसं.. किमान 25 वर्ष तरी झाली असतील नं त्यांच्या लग्नाला.. अजुनही तेच प्रेम तोच ओलावा... तिथल्या गर्दीतली आम्ही तमाम तरुण जनता आ वासुन पाहात होतो हे सगळं.. पण ती डोघं मात्र वेगळ्याच दुनियेत.. डोघांच्याही डोळ्याच्या कडा विरहाच्या कल्पनेने ओलावलेल्या.... खुप काही शिकवुन गेला हा प्रवासापुर्वीचा प्रवास..

Friday, May 4, 2012

अनोळखी वळणांशी झुंजणं हा खरतर स्वभाव नव्हता एकेकाळी.. अवघड वाटा.. नाविन्याची ओढ.. अन् ह्याच नवनव्या वाटांवर स्वतः बनवलेल्या ओळखीच्या काही खुणा.. सारं कसं माझं.. मी घडवलेलं... निर्मीतीचा आनंद काही निराळाच.. आताशा ह्या निर्मितीची एक नशा आहे डोळ्यात... काहीतरी नवीन, निराळं, अपरिचित गोष्टी खुणावताहेत... माझंच क्षितीज माझ्याही नकळत विस्तारतय.... आणि खुले होत आहेत अनेक नवे मार्ग.. माझेच मीपण पारखण्याचे..अन् कधी कधी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आश्चर्याचे सुखद धक्के सुद्धा देणारे.. हे असं स्वतःलाच तिर्हाईताच्या नजरेतंन जाणुन घेणंही मोठं मजेशीर होत चाललयं...

मावळतीचे रंग



क्षणा क्षणाला बदलत जाणारे हे मावळतीचे रंग... अनोख्या छटा, निराळ्या अदा... ढगांचे आकारही किती मोहक... लहान असताना ह्या ढगात आम्ही हवे ते आकार, प्राणी, वस्तू.. अगदी काहीही शोधायचो... आई म्हणायची हे सगळे नं तो बाप्पा बनवतो... त्याच्या लाडक्या लेकरनांच दिसायचे म्हणे ते आकार.... किती अप्रूप असायचं त्या छोट्या छोट्या गोष्टींचं... आताशा मात्र संध्याकाळ होते तीच दिव्यांच्या झगमगाटात... रंगाच्या त्या मोहक अदा बाप्पाने लपवून ठेवल्यात बहुदा... मावळतीचं ते मुक्त आभाळही जप रे बाबा ... नाहीतर ते हि हरवेल ह्या गर्दीत.. अगदी हरवलेल्या त्या निरागस बालापाणासारखं....

.निकाल दिन

१ मे... महाराष्ट्र दिन... कामगार दिन.. माझ्यासाठी मात्र अजून एक खास आठवण..निकाल दिन... शाळेत असताना परीक्षा संपली कि आम्ही उंडारायला मोकळे... भर उन्हात खेळायचं, आंब्याचा रस, मलई कुल्फी , सापशिडी, अस काय काय आठवत उन्हाळ्याची सुट्टी म्हटल कि... ह्या सगळ्यात भीती फक्त निकालाची...रोज १० वाजेपर्यंत लोळत पडलेलो आम्ही निकालाच्या दिवशी मात्र पहाटेपासूनच जागे... मनातल्या मनात देवाचा धावा..रात्री स्वप्नातदिसलेले आपलेच सोडवलेले पेपर.. गेल्या पूर्ण सुट्टीत साध्या विशायांचे नावही विसरले असताना , स्वप्नात हे दिसतच कस हे आजही न उमगलेलं... रोज आईचा ओरडा खाईपर्यंत जागचे न हलणारे आम्ही आजच्या दिवशी मात्र गपगुमान शाळेत जायची तयारी करायचो.. आणि मग आईच्या डोळ्यातली काळजी आणि बाबांच्या नजरेतली जरब चुकवत आमची स्वारी शक्य तितक्या लवकर शाळेत हजर... आज एकाच दिवशी शाळेतल चित्र पालटलेल असायचं... तमाम मुल शांत, बडबड न करता गप्प .... अन तमाम शिक्षक.. मस्तीच्या मूडमध्ये... अब आया उंट पहाड के निचे....असा काहीसा मिश्कील भाव...प्रार्थना, रांगा, मोठ्या बाईंच भाषण ( उपदेश)..ह्या सगळ्या सोपस्कारानंतर निकाल.... पास नापास.. एका मार्काची चढाओढ ..काही आनंदी तर काही पडलेले चेहरे... पण एकूणच सुटकेचा निश्वास.. आणि मनात चाहूल पुढच्या वर्गाची...
इतकी वर्ष लोटली... पण अजूनही निकाल पाठ सोडत नाही....प्रश्न निराळे... उत्तर वेगळी... शाळा कधीच सुटली ... हुरहुरत्या मनात निकालाची वाट मात्र अजूनही...