Monday, May 2, 2016

खरंतर फार मोजक्या लोकांना उत्तरं देण्यास बांधील असतो आपण... पण तरी विचारल्या गेलेल्या प्रत्येकच प्रश्नाने मनात काहूर उठणं काही सुटत नाही... नेमकी उत्तरं शोधताना निरर्थक प्रश्नांना सोडून देता यायला हवं बयो..
....................................................................................
मित्रा अंतरं अशी अचानक नाही नं रे वाढत.. कणाकणाने दुरावत असतो आपण एकमेकांपासून.. अन अगदी हाकेच्याही पल्याड गेल्यावर एकदम भानावर येतो.. अंगावर उमटतो शहारा.. भीतीचा.. तुला गमावल्याच्या भीतीचा.. helpless ला मराठीत असहाय्य म्हणतात ना रे.. बरोबरच मग.. तूला गमावल्यावर मागे उरतं ते हेच सोबत नसलेलं ...असहाय्य... एकटेपण....
..................................................................
काहीवेळा टाळता न येणाऱ्या असतात... सांजवेळ हि त्यातलीच एक... मुळात ती हवीहवीशी असते... तिची ती हुरहूर जीवघेणी असली तरी जिवंत असते आणि दिवसभराच्या मरणात ती एक जिवंतपणाची खुण जपावीशी वाटते.... गुजरते वक्त का एक लम्हा चुराना हो तो याकिनन वो शाम होगी...
...................................................................
ह्या अशा जीवघेण्या कळेचे सोहळे साजरे करणारीही जमात असते बायो .. हो जिवंत जमात.. कळ आयुष्याला पुरून उरणारी हवी फक्त अन तिची वेदना मिरवताही यायला हवी.. हो नं ?
.........................................................................
बयो,
. सगळं कसं स्तब्ध... हे भरून आलेलं आभाळ, वाहणं विसरलेला वारा, तेच शहर, तीच घरं, तेच रस्ते अन तीच माणसं.. सगळं तेच.. वर्षानुवर्ष जिथल्या तिथे... कशातच बदल नाही... सवयीचं झालंय आताशा पण तरी एक अस्वस्थता मनात घर करून बसलीय.. आणि त्यात भर म्हणजे कानात रुंजी घालणारं हे गाणं.. दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है... कारणं कळायला हवीत गं.. ह्या अस्वस्थतेची.. ह्या रितेपणाची.. कारणं ह्या जाणिवांची... नाहीतर हे असं नुसतं वेळी अवेळी पाणावणं काही बरं नाही.. खूप जुन्या ओळखीच्या डोळ्यात अनोळखीपण कसं काळजाला हात घालतं तसं काहीसं हे...
बयो, जीव कसा गं जडतो? सवयीतून? सोबतीतून? कि कोणीतरी अगदी आपल्यासारखं असतं, त्या त्याच्या /तिच्या असण्यावर जीव जडतो? हि जाणीवच मुळात विलक्षण असावी नं.. सुखावणारी... मालकी हक्क सांगणारी.. पण मग हक्क संपल्यावर जाणीवही विरायला हवी नं गं ? हम्म.. नाही नं होत तसं.. one way route हा.. परतीच्या पाउलखुणा पुसलेला... वेस हरवल्या गावासारखा वाढता हा जाणिवांचा प्रदेश.. रोज एक नवं झोपडं नव्या जाणीवेचं... पसारा वाढताच... तरी
तुझ्या माझ्यात आत्ता उमटलेली हि अनामिक जाणीव मिटत पाटी कोरी होईल का गं बयो ?

................................................................................

सावळा अभंग

सावळ्या रूपाचा | सावळाच छंद |
एकरूप देहभान | वेणूनादी.. 

उरी दाह लक्ष | सुखी एक क्षण |
जीवितांचे श्वास | विसंवादी...

उमलण्यास जिच्या | नसे मोहबंध |
इच्छा पोटी एक | रुजवावी...

फकिरी भ्रमंती | निर्मोहीच ध्यास |
नवी शून्य वाट | गवसावी...
जगावेगळे असे काहीसे वेड म्हणू कि ध्यास म्हणू
अंधुक अंधुक हजार वाटा, एकीला का पळवाट म्हणू 
.......................................................................................
मनातल्या असंख्य प्रश्नांसोबत राहणं ज्या क्षणी सुसह्य होईल त्या क्षणी शांतता शोधणाऱ्या अखंड वाटांना पूर्णविराम मिळेल बयो...
............................................................................................
मावळतीच्या उन्हाची एक तिरीप टेबलवर येतेय... सोनेरी रंगात हा करडा टेबल top झळाळतोय.... माझा हात मात्र ह्या सोनेरी उन्हातून कोऱ्या कागदाकडे... कधीकधी हे कोरेपणसुद्धा आश्वस्त करतं नं...
...............................................
मधुनच आठवतं काही.. तळाचा गाळ पुन्हा ओठांवर आणणारं.. अलगद भिजते पापणी अन् ओघळतेच एखादी सर.. खरंतर तेव्हा कोणीच नको असतं ... कारणं विचारणारं ... अनामिक ओझं उतरवत हलके होत असतो आपण..हळुवार... आभाळाच्या गाण्यांचा सुर मिळावा अन् नेमका समेवर ठसा उमटावा तशी थांबते सर.. अवचित..आवर्तन पुर्ण करणारी..
........................................................................
एकेक दिवस असाही येतोच कि... काम असतं..त्याचा डोंगरही असतो.. आणि पुन्हा सोमवारही असतो... पण तरी, कुठल्याश्या मुठीतून( कि मिठीतून )मन हळूच पसार होतं... भर उन्हाचं तळ्याकाठी एकटंच उसासत बसतं... स्तब्ध तळं सुसाट मन.. कशाकशाचा संबंध नसतो तरी कसं कोण जाणे तळं मनाला गोंजारत असतं... गरम झळा गार पाणी सगळंच तसं विचित्र... इवल्याश्या मनाचं इतकं मोठ्ठं बहरणं... एकेक पळ सरत तळं मावळतीला येतं , गजबजलेल्या मनातलं नेमकं तेंव्हाच ओठांवर येतं... तळ्याच्याही तळाशी जात जात मनं हलकं होत जातं... कामाच्या आठवणीने अन पुन्हा भानावर येतं... एकेक दिवस असाही जरा जरा वेगळा असतो सोमवार असला तरीही तोइतका वाईट नसतो...
..........................................................................................
अंगणातल्या वेली मोगऱ्याला बिलगून एक बंगई असावी कुई कुई आवाज करणारी.. पितळी कड्यांची अन शिसवी दिमाखदार पाटाची... उन्हाळ्यातली निरभ्र रात्र अन सोबतीला चांदण्यांची आरास.. ह्या बंगई वर उताणं झोपून वेली मोगर्याच्या गंधावर हलके झोके घेत मला एकदा हे काळंभोर आभाळ निरखायचं...
.....................................................................................
टाळायचा म्हणत जाणून बुजून बदललेला रस्ता जेव्हा पुन्हा त्याच नकोश्या मुक्कामी पोहोचतो नं... तेव्हा लागत जातात अर्थ सवयींचे.. पावलांच्या... मनाच्या... सवयींचे अर्थ...
.......................................................................................
हवं तेव्हा हवं तिथून माघारी फिरता यायला हवं... इतकं विनापाश जगणं जमेल बयो?
..............................................................................
पाचोळ्याच्या गर्दीत एखादंच हिरवं पान बघितलं कि कसं चर्र होतं नं .... तसंच काहीसं मला भर गर्दीत तुला बघितलं कि होतं... हि हिरवीगर्द ओल झिरपत नाही रे आताशा.. खोल खोल
............................................................................
उन्हाळ्यात आभाळाचा रंग जास्तच निळा होतो का रे?? आज तर आभाळ असं दिसत होतं जसं काही कोणीतरी नीट आवरून घडी घालून ठेवलंय...ढगांची सुरकुतीही नसलेलं कडक निळं आभाळ...
......................................................................
शाम की किसी कोनसे आ जाती है रात.. तब याद आते हो तुम.. हाथसे फिसले रेत जैसे वक्त जब दरवाजेपे आके रुक जाता है.. तब याद आते हो तुम.… कही कभी तो ये रात काले बादल ओढ़े आती है.. जैसे कभी तुम आया करते थे.… रंगीन सपने ओढ़े..... ना ये तब बता पायी न अब.… या शायद फिर कभी नहीं.… पर रात की चौखट पे सवेरा अपना पहला कदम रख मुस्कुरा देती है.… तुम अब भी वही उस चौखट पे याद आते हो.……
आपल्या माणसाची... त्या नात्याची... काळजी वाटण्याचा हक्कही कमवावा लागतो का गं बयो??
..............................................................
छोट्या छोट्या सध्या अपेक्षा बाळगून असतो रे माणूस.. दरवेळी पूर्ण होतीलच असं मागणं नसतंच.. उलट त्यातल्या काही अपेक्षा अवास्तव आहेत हेही कुठे न कुठेतरी मान्य केलं असतं मनाने.. पण तरी दुखावले जातोच नं .. वाईट वाटतंच नं .. ते नाहीच रे नाकारता येत...

सोबत असताना संवाद घडावा हि फार मोठी अपेक्षा नव्हती न रे ?
.........................................................................
नावडतीच्या गोष्टीतही आवडणारं असतंच कि काहीतरी.. फक्त ते ओळखता यायला हवं.. जपता यायला हवं हो नं बयो...
.............................................................................
तू एक निरागस स्वप्न ह्या काजळ काळ्या राती 
मी होऊन काजव माळ ते क्षितीज गोंदवत असतो
.............................................................................
माणसाचं अनुभवणं थांबलं कि त्याचा पुतळा व्हायला वेळ नाही लागत गं बयो...
........................................................................
जरासं समजूतदार शहाण्यासारखं वागावं अन समोरून त्याची वारेमाप दखल घेतली जावी इतकं साधं सोपं असतं कौतुक... हवंहवंसं... ह्या अखंड गर्दीत कोणीतरी असं नोटीस करणंच किती खास असतं नं... अन त्यात जर हे शहाणपण नोटीस करणं असेल तर क्या कहना... आपल्या आतलं एक पिटुकलं लहान मुल ह्या कौतुकासाठीच तर जपलेलं असतं... एवढ्याश्या शहाणपणाचं एवढं मोठ्ठं कौतुक... मज्जाच नं
.......................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..........................................................................
ह्याच एका ओळीसाठी जन्म असावा अन तिच्या पाठलागात थेट शेवट व्हावा इतकंच काय ते आयुष्य एका लेखणीचं
.........................................................................
रात्र नं कायम प्रौढ वाटत आलीय..तिला जोडल्या गेलेल्या संदर्भामुळे असेल कदाचित, पण तिचं असणं कायमच समजुतीच्या पातळीवरचं...अल्लड असण्याचा अधिकार तिला नाहीच जणू.. पण तरी.. क्वचित कधीतरी अपवादानेच का होईना एखादी बाल्यावस्थेतील रात्र अचानक सापडते.. निरागस नितळ रात्र.. अवखळ हसू पांघरलेली मोकळ्या माळरानावरची रात्र...मिट्ट काळी रात्र... चांदण्याचं गोंदण, गर्भगार शांतता, गूढ ओढ.. अशा विशेषणांची तिला गरजच नाही...तिला असतं फक्त लाघवी वेडाचं वरदान.. जे ती जपत असते... न जाणो कित्येक युगं लोटली.. पण आजही वयात येण्याआधी एक रात्र अशीच हळवी होते.. हो नं
......................................................................................'
तुटायला नं बयो एक क्षण पुरेसा असतो.. किंवा कदाचित तो saturation point येईपर्यंत आपण दुर्लक्ष करतो.. सगळ्याकडेच... अन हा शेवटचा point... सगळंच संपवणारा... ह्या तुटण्याची intencity नं त्यानंतर होणार्या त्रासावर अवलंबून असावी का गं... तसं असेल तर जोडले गेले होतो कधीकाळी ह्यावर विश्वास तरी कसा गं ठेवावा...
काहीतरी नवीन मिळेल ह्या आशेने आपण जुनंच चाळत बसतो बयो कित्येकदा... बाकी काही नाही पण फक्त कधीकाळी जे हट्टाने नाकारलं होतं त्यात पुन्हा गुंतायला होतं....
....................................................................................
मौनातल्या त्या स्वराने डोळा पूर हळवा यावा 
क्षण तो भाळण्याचा बस इतकाच कातर व्हावा
...............................................................................
सोडून दे सखे तू हा हट्ट बहरण्याचा 
ऋतू पानगळीचा अशाने टळणार नाही
...................................................................................
नेहमीच्या restaurant मधला maneger आज सहज रस्त्यात भेटला.. साध्या कपड्यात होता... ओळखताच आला नाही.. म्हणजे दरवेळी त्याच्या युनिफोर्म मध्ये भेटतो आम्ही अन सवयीने ओळखही दाखवतो पण आजचा हा वरवरचा वेगळा अवतार अनोळखी वाटला रे.. 
नेहमीच्या कडवटपणाची सवय झालेली असताना कोणी अचानक गोडवे गाऊ लागलं कि असंच अनोळखी वाटतं नं अगदी तसं
.......................................................................
आताशा स्वत:चं स्व असणं अलगद मिटून घ्यावंसं वाटतंय ... कोणाचं नसणं इतकंही अधोरेखित होऊ नये गं बयो...
..................................................................
समोरच्याच्या अवघड प्रश्नांच्या फैरीत अचानक आपलं एक हरवलेलं उत्तर सापडावं असंच काहीसं
...............................................................
हे एक विलक्षण घडतंय… उतरणीचं ऊन असं थेट व्हरांड्यातून रेंगाळत पावलांपाशी निजलंय. हातात एक पुस्तक अन डोक्यात त्या पुस्तकाचं मोहोळ… अंगभर पसरलेली सुस्ती अन टक्क डोळ्यांनी चाललेली पारायणे... त्या गुंत्यांची… गुंता त्या ऊन्हाचा… त्या रेंगाळण्याचा… पुस्तकाचा… त्यातल्या संदर्भाचा अन गुंता या निवांततेचा !
....................................................................
तुला नाहीच कळणार गं म्हणताना... एक संधी... समजून घेण्याची.. चाचपडून बघायला हवीच नं गं... शब्द न शब्द समजेलच असं नाही गं जगण्यातला...पण हे अनुभावांचं वाटून घेणं तरी जमायला हवं बयो.... जमायला हवं...
....................................................................
कुठल्या ओंजळीतून झिरपते अद्वैताचे देणे
रित्या किनारी फकीर गातो अंधाराचे गाणे
...................................................................................
पाझरत्या पन्हाळीच्या टोकावरून ओघळणारी ती एकसंध ओली सर जशी अलगद विसावते नं तळहातावर.. तशी असते सोबत तुझी.. नितळ... पारदर्शी...
..............................................................................
न घडलेल्या गुन्ह्याचे दुखरे परिणाम विनाकारण भोगावे लागले नं बयो कि 'अगतिकता' ह्या शब्दाचा खरा अर्थ कळतो.

समईच्या ज्योतीत अस काय असतं रे जे खोलवर शांत करत जातं... दिवे सगळीकडेच लागतात.. प्रकाश तर तसाही नवा नाहीच पण हि ज्योत नं वेगळी असते.. तिचं प्रतिबिंब डोळ्यात उतरलेलं बघितलं आहेस नं .. देव असाच असतो ना रे
..........................................................................................................
खरंतर खुप साधं सोप्पं असतं नातं.. पण गुंता नं आपण वाढवतो.. हौस मोठी नं गुंत्यात अडकायची... त्यापेक्षा प्रवाह करु रे नात्याचा.. वाहता..हवं नको सारं सामावणारा
........................................................................
काही स्वप्न उगाच अर्धवट राहतात ना रे.. म्हणजे हेच बघ नं... खुपदा वाटतं ह्या अशा हुरहुरत्या संध्याकाळी स्वत:च्या घरी बाल्कनीमध्ये बसावं.. सीडी प्लेअर वर एखादी हळवी रागदारी असावी... हातात एखादं पुस्तक... अन चहा... गार झालेला... गाणं कि पुस्तक..नेमकं कशाने ठाऊक नाही पण डोळा पाणी दाटलेले... चित्त भरकटलेले... अन हळूहळू गडद होत जाणाऱ्या अंधारात विरघळण्याची अनावर ओढ... हि वेळ टाळायला नको... नकोच... स्वप्नवतच वाटतं हे सगळं... अगदी ह्या सगळ्यानंतर येणाऱ्या दिवेलागणीपासून ते देवघरात समई उजळताना त्या प्रकाशात शांत होणाऱ्या मनापर्यंत सारंच... स्वप्नवत...
........................................................................................................
इक भिनी मीठी खुशबू ओढे मिलती है सुबह आजकल... नर्म धूप हथेलिपे आके कुछ यू मुस्कुराती है मानो जैसे अपना करारापन पिछली बारीश में भूल आयी हो... हर और जैसे कोई खुशियाँ बाट रहा हो ऐसी ताजगी भरी सुबह.. सर्दियोंकी सुबह...
.............................................................................................................
आपल्या जवळच्या माणसांना समजून घेता न येण्याचा guilt सगळ्यात मोठा गं बयो ..
..............................................................................................
खळखळून हसता यायला हवं बयो... समोरच्याच्या मनातली बहुतांशी जळमटं त्यात बेमालूम विरघळून जातात...
.............................................................................
घ्या बघता बघता 31 डिसेंबर पण आला.. आपल्याकडे नं फक्त निमित्त हवं असतं celebration चं.. नाहीतर अगदी गौरी गणपतीला लागलेल्या झगमगीत दिव्यांच्या माळा पार ह्या year end पर्यंत उजळल्या नसत्या.. आषाढाच्या पहिल्या सरीत फ्रेश झालेलं मन थेट 31st च्या थंडीत उधाणलं नसतं... मस्तय नं पण हे... उत्सव साजरे करणं... आनंद वाटून घेणं... कसलंही बंधन नसलेलं हे साजरीकरण... निमित्त काय मिळत जातात.... सुख मिरवण्याची इच्छा हवी.. हो नं ?
..............................................................................................
ये उन दिनों की बात है जब अनजान था ये शहर... यहां की गलियां... यहां के चौराहे.. अनजान थे हम... हा और थोड़ेसे पागल भी.. एक दूजेका हाथ थामें जब पहला कदम रखा था इस जमीन पर, तो याद है रुह का एक कतरा हमने वहीं बो दिया था... उन दिनों भी इस शहर ने उस रुह को पनाह दी थीं.. ओर आज भी उसे अपने आपमे समाये है...उस दिन यहाँ का हर चौराहा अजनबी था हमारे लिये.. और आज देखो ऐसी एक भी छत नहीं यहा जिसने हमें अपनाया नहीं... ये बात उन दिनों की हैं और आज की भी.. ये बात हैं उस सफर की..अजनबी शहर के अपनेपन के ओर बढ़ते सफर की बात... अपनी बात
........................................................................................................
बयो.... अख्ख्या दुनियेसमोर I dont care attitude मध्ये वावरताना खोलवर जपलेलं हळवेपण जिथे दिलखुलासपणे मांडता येईल असं एकतरी नातं असावं... हो न..
...............................................................................................................
प्रवाह आटला कि वाहत्या नदीचा डोह होत असेल का गं बयो...
..............................................................................
परतीच्या वाटेवरचा हा मंजुळ घुंगुरवाळा
दिवसाला उलटून येती संध्येच्या कातरवेळा
..................................................................

हि वेळ अशी एकाकी अंगणात घुटमळणारी
लेऊन लाजरी स्वप्ने उंबऱ्यात गुणगुणणारी
कोई अपनी मुस्कुराहट आपसे बांटना चाहे तो उसे मना नहीं करते बेटा...
................................................................................
सिग्नलपासून साधारण 100 मी वरचा गाड्यांचा वेग हा बघण्यासारखा असतो... हिरवा दिवा ते पिवळा आणि पिवळा ते लाल होईपर्यंतची त्यांची धावपळ विलक्षण... पण खरा कस कुठे लागतो माहितेय? सिग्नल लाल होताना योग्य ठिकाणी थांबण्यात... करकचून ब्रेक मारावा लागतो.. धक्का बसतो.. चार शिव्याही निघतात..पण अति घाईत होणारा पुढचा अपघातही टळतो... आपले बरेचसे निर्णयही असेच असतात नं ... नेमक्या क्रोसिंगला थांबलेले... नाहीतर अपघात अटळ
........................................................................................
याद है.…? 
शहर के बीचोंबीच एक पुराना बरगद का पेड़ हुआ करता था ...

हराभरा पेड़ ...

एक शाम यूँही बातों बातोंमें तुमनेही कहाँ था, 

कुछ सौ साल की होगी उम्र इसकी शायद ...

जरासा डरसी गई थी में... बुढा बरगद कहीं टूट पड़ा तो ...

तब तुमने दिखाया था मुझे

उसके हर टेहनी पे बसा एक नया शहर ...

नन्हे परिंदों का प्यारा शहर.…

सुरीले सुरोंमे चहचहाता शहर....

ख्वाबोंका शहर …

भला अब टूटने का डर किसे ...

सुना है कल रात की बारिश का उस बरगद से झगड़ा हुआ.…

बूढ़ा था बरगद..... हार गया.....

सुना है अब वहा कुछ भी नहीं बचा.....

ना नीव ना शाख.... ना ही अकेली कोई जड़.…

फिर वो

परिंदे ??... उनके घर ??...उनके सुर ??.... उनके ख्वाब ??....

एक शहर के ग़ुम होने की रिपोर्ट कही तो दर्ज होगी ना.… 
कुठे एका ठिकाणी असं तिचं मूळ कधी रुजलंच नाही गं बयो... सततची फरफटच नशिबी.. अन तरी 
बहरण्यास सोडच पण साधं अंकुरण्यासही ह्या वांझोट्या नशिबाची साथ लागते हे फार उशिरा कळालं गं तिला...बस इतकंच..
...................................................................................
दडवून दु:ख त्यांचे जे सोहळ्यात मग्न
कर्जात त्या सुखाच्या अस्वस्थ चेहरे
...................................................................
जराशा स्वराने उभा देह कातर
असे दिव्यदान ओंजळी पडू दे 
वेदनेचा ज्याच्या नसे डोह डोळा 
असा निष्पाप क्षण ओठी वसू दे

मिळे ज्यास शिक्षा जिता मृत्युदंड
असा सांग होता गुन्हा कोणता तो
उतरणीस ज्या शाप एकलपणाचा
असा कोणता जन्म गर्भात रुजतो
.............................................................................
कुण्या अज्ञाताने अडवावी वाट तशी लागते ठेच जीवघेणी
................................................................................
कोऱ्या करकरीत शुभ्र कागदावर अनवधानाने पडलेला शाईचा एक ठिपका म्हणजे कविता.
.......................................................
आपण आपलं फक्त निमित्तमात्र असणं स्वीकारावं बयो..
...............................................................
लाघवी क्षणांचा मोह रे नश्वर
निरंतर फक्त मोहोळ आठवांचे
.......................................................
तळ दिसेल इतका नितळ नसावा रे डोह डोळ्यांचा

ज़िंदगी जीने के लाख बहाने शायद 
एक बहना तो ये भी होता 
आधे अधूरे बेबस जवाबों को 
उनके सवालों के हाथ सौपना होता 

इक तिनकेसी लगती जिंदगी तब 
जब सारे सवालोंके ख़त्म होते भी 
एक जवाब फिरभी बाक़ी रहता
अनचाहा .. अटपटा .. अटकसा जवाब ..

कुछ नहीं तो एक सवाल ही उधार दे दे मौला
काहीही कारण नसताना एखादा क्षण अचानक अधोरेखित केला जातो… कुठले संदर्भ, कुठले प्रसंग कशाचीच परवा नसलेला हा क्षण न सांगताही ध्यानीमनी जपला जातो. 
सामान्यांचं असामान्य असंच होतं नं…
.....................................................................................................
खूप दिवसांनी खूप कौतुक..मन आनंदाने ओतप्रोत.. त्यातूनच चेहऱ्यावर रेंगाळणारा आत्मविश्वास.. आणि डोळ्यात? डोळ्यात तेच निरागस हसू.. ओळखीचं..
...................................................................................................
सोसवेल तेव्हढंच वेडं असावं गं बयो... निसटलेल्या एक एक क्षणाचं हसं व्हायला नाहीतरी वेळ लागत नाहीच हो नं
...........................................................................................................
घरं मोठी होत गेली कि त्यात स्वतःशी स्वतःला जोडले जाण्याच्या जागाही वाढत जातात...आपसूक..
..................................................................................................................
आभाळाला आभाळाचं आभाळ होता येत असेल का रे ?
.............................................................................................................
सवय वाईटच... कोणाच्या असण्याची.. नसण्याची...प्रेम करण्याची ..अव्हेरलं जाण्याची..टाळण्याची .... टाळलं जाण्याची.... टाळलं जाण्याची?ह्याचीही खरंच सवय होते का रे?
...............................................................................
अंधार म्हटलं कि हरवणं येतं ओघाने... पण हि रात्र मात्र हरवलेलं काहीतरी अलगद ओंजळीत ठेऊन गेलीय.. हि जादू अंधाराची कि शांततेची रे... बाहेरचं जग शांत होत गेलं कि आतला कोलाहल ऐकू यायला लागतो.. एकेक आवाज स्पष्ट होत जातो.. सूर सारेच निराळे.. तक्रारीचा, बंडाचा, प्रेमाचा, रागाचा, काळजीचा... उजळ होत जातो अन नकळत विझतही जातो an शेवटी उरतो तो शांततेचा सूर... ओळखीचा..... रात्रीच्या मिट्ट गाभाऱ्यात उमटलेला मीपणाचा सूर.. पवित्र..नितळ सूर माझा...
...............................................................................................
चहुबाजूंनी वेढून येता अंधारालाच घर म्हणावे...
...............................................................................
भर उन्हात निर्मनुष्य रस्त्याच्या पार टोकाला चमकलं काहीतरी... आणि सोबतच त्या माणसाचे डोळे ही... वाट सापडल्यागत... बाईचं चित्त मात्र अजूनही शून्यात.... रस्त्यालगतच्या माळरानाला पिंगा घालणारी नजर... लक्कन चमकलं काही आणि माणूस हपापला.. केविलवाण्या जगण्याला सन्मान मिळावा तसा.. झेपावणार तिकडे इतक्यात.. थबकला... बाईने न बघता ओळखलेले मृगजळाचे भास माणसाला कळायला वेळ गेला इतकचं...
........................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..............................................................................................
नक्की किती ठोकरा खाल्ल्या कि शहाणपण येतं... बयो..
.................................................................................................
बयो पूर्वी ज्या वेगाने एखाद्या अनोळखी शहराची, जागेची अचानक ओळख पटायची.. ती आपलीशी वाटायची.. नाळ जोडली जायची.. त्याच वेगाने आताशा ओळखीची माणसं अनोळखी व्हायला लागलीत... त्यांना चिकटलेल्या संदर्भासहित....
.............................................................................................
एखाद्या क्षणाचं देणं आपण फेडू शकत नाही म्हणून लगेच हारतो का रे आपण ? मग अनाहूतपणे ओंजळीत अनपेक्षित सुख ओतणाऱ्या क्षणांना रे काय म्हणायचं ? नाही नं असं वेगळं वागता येत. मग कशाला उगाच या क्षणांचे सल बाळगायचे. जगुयात नं आला प्रत्येक क्षण भरभरून… येतोस सोबत? 

तुळशीबाग

दिवाळी.. दिवाळी म्हटलं कि शॉपिंग आलीच अन पुण्यात शॉपिंग म्हटलं कि तुळशीबाग अतिआवश्यक.. नाही नाही म्हणजे अगदीच तसं काही नाही पण ते म्हणतात नं प्रथा परंपरा.. म्हणून आपलं तुळशीबाग कंपल्सरी.. 
तर तुळशीबाग म्हटलं कि (अतिउत्साही) बायका.. बायकांचा समुद्र म्हटलं तरी चालेल (मला एक शंका आहे, सकाळी ९.०० वाजताही इथे भरगच्च( ए नो चुकीचा अर्थ) बायका अन रात्री १०.०० वाजताही तितक्याच?? बायका बदलत्या असतात नं कि त्याच ठाण मांडून बसतात?? त्यांची सततची बडबड.. धक्काबुक्की.. घामट वास (त्यात एखादा मोगरा किंवा जुई वैगरे पण असतोच हा).. अन चेहऱ्यावर अजि म्या ब्रम्ह पहिला असा भाव..हे घेऊ का ते घेऊ ( खरंतर इतकं नवीन तिथे काहीच नसतं).. भावावरून आठवलं , ह्या (मुरलेल्या) बायकांचा तुळशीबाग म्हणजे हक्काचा भाव/घासाघीस करण्याचा अड्डा !
मनसोक्त खरेदी करणाऱ्या अन तरी कधीच तृप्त नसलेल्या ह्या बायकांच्या गर्दीत सगळ्यात दुर्लक्षित अन उपेक्षित जीव कोण असतो माहितेय? अहो ह्या बायकांसोबत असलेले पुरुष सदस्य (नवरा,बॉय फ्रेंड, मित्र, भाऊ कोणीही असला तरी तुळशीबागेत हमालच ) सुरुवातीला ह्या गर्दीत आशाळभूत नजरेने 'विंडो शॉपिंग' करणारा हा सदस्य थोड्यावेळातच मात्र दीनवाणा दिसायला लागतो.
मुळात आमच्या तुळशीबागेची रचनाच मुळी चक्रव्युह.. एकदा आत शिरलं कि पूर्ण फिरुनच बाहेर पडायचं अन ह्यात आमचे पुरुष पडले नेमके अभिमन्यु.. ज्या आईच्या गर्भात इथून बाहेर पडायचा मार्ग शिकायचा तीच ह्या मायाजालात रमलेली.. सुरुवातीला चारही बाजूंनी होणारे सुख स्पर्श झेलत तरंगत मध्यावर तर पोहोचतात ते पण तिथे पोहोचल्यावर मात्र गलितगात्र होतात हो ते .. तुळशीबागेतली ती छोटी छोटी दुकानं.. आत असंख्य बायकांची अखंड गर्दी..त्यात दुकानाच्या पायरीवर हा उभा.. एका हातात झोपलेलं मुल दुसऱ्यात पाणी bottol अन दोन पायांच्या मध्ये खरेदीच्या पिशव्या असा तोल सांभाळत हसतमुख चेहऱ्याने उभा... आता मला सांगा अशा परिस्थिती, दुकानातल्या गर्दीत कोपर्यातून हात उंचावून "अहो ,कोणतं कानातलं छान दिसतंय?" असं विचारणाऱ्या बायकोला काय म्हणावं? किंवा नेमक्या त्याच वेळी खांद्यावरच्या बाळाने आई म्हणून भोकाड पसरण्याला योगायोग म्हणावा का? आणि ह्यावर कडी का काय म्हणून पुन्हा त्या गर्दीतून विजयी मुद्रेने येणाऱ्या बायकोने आवडलेलं सगळेच कानातले आणल्यावर नवऱ्याकडून " बघू गं.. खूप सुंदर आहेत हं? " अशी अपेक्षा करावी?( अरेरे!!!! वाईट वाटतं हो )
हा झाला एक प्रकार , पुढची catagory तर अजून भन्नाट.. हाय क्लास, वेल mannerd पण वाट चुकलेली पब्लिक.. हि जमात कशी ओळखावी...तर शोर्ट pant , तसलाच मळका टी, डोक्याला बंधाना, डोळ्याला branded गोगल, पाठीवर स्याक अन डोळ्यात कमालीचे आश्चर्य चकित भाव हि ह्यांची लक्षणं ...मुळात इतक्या कमी किमतीत इतकं सगळं मिळतं ह्यावरच ह्यांचा विश्वास नाही अन म्हणून प्रत्येक वस्तूकडे बॉम्ब असावा अशा संशयित नजरेने बघणारी हि जमात..दुकानात कमी अन ज्यूस च्या दुकानासोमोर जास्त आढळणारी ..पण मूळ स्वभाव इथेही कायमच हा... मुलींना इतक्या स्वस्त भावाची सवय नाही अन तिच्यासोबतच्या मित्राला तिची काळजी करण्यावाचून काही सुचत नाही."baby have some water " पासून सुरु झालेली त्याची गाडी " बेबी, you ok ? its so crowdy here , lets go na " वर कधी जाते त्याचं त्यालाही कळत नाही..
मॉल मधल्या चकचकीत मुलींची सवय असलेला तो त्याच्याही नकळत तुळशीबागेतल्या घामट सुंदरींना बघून न बघितल्यासारखा करायला लागतो.. आणि तरी रस्त्यावरच्या गाड्यातून कानातली गळ्यातली घेताना रमलेली ती बघून त्याचं आश्चर्य काही लपत नाही... एलिअन सारखा काहीतरी भाव घेत पूर्ण वेळ त्या गर्दीत फिरणारा हा प्राणी तिथून बाहेर निघताना मात्र त्यातलाच एक होऊन निघतो.. हो न? अहो हीच तर खासियत आमची. आमच्या तुळशीबागची.. इथे मिळणाऱ्या वस्तू इतर कुठे मिळत नाही असं काही नाही पण इथे मिळणारा अनुभव मात्र दरवेळी नवा असतो..
सणासुदीचा साज लेऊन सजलेली तुळशीबाग म्हणजे साक्षात लक्ष्मीच.. कोणी कितीही नावं ठेवो ह्या गर्दीला पण हि गर्दी म्हणजे चैतन्य असते.. त्या शहराचं.. हो नं? निदान ते अनुभवायला तरी येतंय नं यंदा तुळशीबागेत ?
अशी एक टळटळीत निवांत दुपार.. काम नसलेली..रिकामी..एखादा बस स्टोप बघायचा.. सहसा गर्दी नसलेला..आणि बसायचं तिथे...दांड्याला रेलून..समोरचा तुरळक गर्दीचा रस्ता न्याहाळत..रस्त्यापल्याड्च्या इराणी हॉटेलचा दुष्ट सुस्त मालक.. पोर्यांवर ओरडणारा...त्यापल्याड कोलेजची एक दोन जोडपी.. एकमेकात गुंग.. कोपर्यावरून वळणारी हिशोब करून घरी निघालेली भाजीवाली मावशी.. पोरांना घरी ठेऊन शोप्पिंग ला निघालेल्या टापटीप तयार गृहिणी.. एक न दोन...तुरळक गर्दीतली नमुनेदार लोकं..मजा असते रे त्यांना असं एका कडेने बघणं.. अरे हो त्यात तुझ्यासारखाही असतो बरं एखादा...एक मिटिंग आटोपून दुसर्या मीटिंग साठी पळणारा...पण मधल्या वेळात .. "च्यामारी, आता पुन्हा तो गर्दीचा प्रवास "म्हणत वैतागत टपरीवर एक कटिंग मारणारा...एखाद्या टकाटक आजी असतात भजनी मंडळाला जाणार्या..रस्त्याच्या कडेने पुटपुटत पण लगबगीनी पावलं उचलणाऱ्या.. तरतरीत आजी.. आणि एक आजोबा पण.. आजीपाठोपाठ घराबाहेर पडलेले.. निवांत..आपल्यासारखेच.. तेही त्या बस स्टोप वर येतात..सहज बाजूला येउन बसतात आपल्या .. "काय रे पोरांनो, काही काम धाम नाही का ?"अस दटावून विचारणारे.. पण खरतरं आयुष्यभर जोब केला असतो नं त्यांनी ..या मोकळ्या दुपारची लज्जत त्यांना नीटच कळलेली असते.. त्यामुळे आपण असे मोकळे बघून असूया वाटणारच.. आपल्या उत्तरावर मात्र जम खुश होतात हं ते "ऑफिस तर रोजच असतं हो आजोबा .. अशी निवांत दुपार अभावानेच कधीतरी मिळते.. हो नं "...इतरवेळी दहा प्रश्न विचारणारे.. शंभर चौकशा करणारे हे अनोळखी आजोबा आता मात्र गप्प तिथून निघून जातात..आपण पुन्हा तिथेच.. रस्ता न्याहाळत..एकही शब्द न बोलता अखंड बोलत असतो आपण.. सतत.. दुपारच्या भाजक्या उन्हात आपल्याशीच संवाद सुरु.. पण कशाच्या तरी सुगंधाने माझी तंद्री मात्र चाळवते.. कसला बरं हा सुगंध.. हा मोगरा.. नाही ...जाई.. नाही रे हा ताज्या गुलाबाचा...संध्याकाळी गजरे विकणाऱ्या मावशी बस स्टोपच्या मागच्या सावलीत गजरे विणत कधी आल्या कळालेलं हि नसतं नं..त्यांची ती तल्लीनता.. एकाग्रता..कामातली लय.. एकेक फुल गुंफतानाची काळजी अन गजर्याची गाठ मारताना चेहऱ्यावरचं सुख.. जगाशी काही देणं घेणं नसत त्यांना.. त्यांचं विश्व त्या फुलांमध्ये..अन आपलंहि...मनभरून फुलांचा टवटवीतपणा अन श्वासात त्यांचा गंध भरून आपण पुन्हा पूर्वरत... ताजे तवाने .. रिकाम्या दुपारची झोळी हवी तशी भरल्याच्या समाधानात

........................................................................................................................................
मधुनच आठवतं काही.. तळाचा गाळ पुन्हा ओठांवर आणणारं.. अलगद भिजते पापणी अन् ओघळतेच एखादी सर.. खरंतर तेव्हा कोणीच नको असतं ... कारणं विचारणारं ... अनामिक ओझं उतरवत हलके होत असतो आपण..हळुवार... आभाळाच्या गाण्यांचा सुर मिळावा अन् नेमका समेवर ठसा उमटावा तशी थांबते सर.. अवचित..आवर्तन पुर्ण करणारी..
.....................................................................................................................................