Sunday, October 11, 2015

सिग्नलपासून साधारण 100 मी वरचा गाड्यांचा वेग हा बघण्यासारखा असतो... हिरवा दिवा पिवळा आणि पिवळा ते लाल होईपर्यंतची त्यांची धावपळ विलक्षण... पण खरा कस कुठे लागतो माहितेय? सिग्नल लाल होताना योग्य ठिकाणी थांबण्यात... करकचून ब्रेक मारावा लागतो.. धक्का बसतो.. चार शिव्याही निघतात..पण अति घाईत होणारा पुढचा अपघातही टळतो... आपले बरेचसे निर्णयही असेच असतात नं ... नेमक्या क्रोसिंगला थांबलेले... नाहीतर अपघात अटळ
..........................................................................................
उत्स्फुर्तपणे लिहिता लिहिता अचानक शाई संपत कागदावर चर्रर कोरडा ओरखडा उमटावा तसा संपतो एखादा दिवस.. भर दुपारी...
..............................................................................................
इथून तिथून सारंच तसं सारखं असतं.. दिवस अन रात्र त्यामधल्या दुपारसकट...एकेकटी ... धावपळ सगळी फक्त वेगळेपण शोधण्याची अन हे सारखेपण टाळण्याची...हो नं?
............................................................................................
समाधान म्हणजे नेमकं काय असतं गं बयो? खूप दिवसांपासून मेहनत घेऊन आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडते तेंव्हा मिळतं ते? कि ध्यानीमनी नसताना कोणाच्या तरी असण्याने कुठल्या तरी एका क्षणाचं सोनं होणं म्हणजे समाधान?? नाही नं सांगता येत? हम्म... ठाऊक आहे मला.. जसं कोणाच्या असण्यावर.. नसण्यावर... एखाद्या क्षणाच्या त्या घटनेच्या घड्ण्यावर आपला ताबा नसतो नं.. तसच असतं समाधान...
.........................................................................................
पहिला पाऊस पडून गेल्यानंतरचा फुललेला मोगरा काही औरच... आसमंतातल्या प्रसन्न ओल्या वातावरणात मोगऱ्याचा नितळ गंध... हा गंध न ऋतू नुसार बदलतो रे...उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोवळा नाजूक गंध... भर रणरणत्या उन्हाळ्यातल्या तापलेल्या रात्रीचा मादक मोगरगंध...अन हा असा पावसाळ्याच्या तोंडावरचा परतीचा गंध.... समजूतदार.... मला मात्र नेहमी गोंधळात टाकणारा... नुकत्याच उमललेल्या ओल्या मातीच्या मृदगंधाचं स्वागत कि ह्या मोगऱ्याला निरोप...
..........................................................................................
पाउस म्हटलं कि कविता येणार.. नको नको म्हटलं छतावरून ओघळणार्या पागोळ्यांतुन शब्द तळहाती येणार... हाती कॉफीचा मग..त्यात पावसाचा एखादा थेंब.. अन पुढ्यात कुर्कुर्णारी भजी...एक कोरा कागद.. आखीव रेखीव रेघ हरवलेला.. सोबत तितकंच रिकामं पेन..आसुसलेलं... पावसाची शाई करण्याची आयडिया तशी तितकीही वाईट नाही नं... ऐकू येणारा समोरच्या तळ्यातला तो पावसाचा ऑर्केस्ट्रा.. अन त्यात जर पाउस रात्रीचा असेल तर स्ट्रीट लाईट मध्ये रंगलेला त्या सरींचा लाईट शो... पाउस म्हटलं कि ग्यालरीतल्या कठड्याला रेलून उभा ध्यानस्त तू अन तळहाती साचलेल्या शब्दांना मुक्त करणारी मी.. अन नुकत्याच जन्माला आलेल्या ह्या नव्या कवितेसोबत.. आपण...एकरूप..
.................................................................................................
क्षण म्हणजे नक्की काय रे असतं? हे वेळेचं परिमाण म्हणावं तर ह्याचं मोजमाप काय? किती सेकंदांचा, मिनिटांचा, तासांचा एक क्षण? सांगू शकतोस? नाही नं.. मी सांगू? क्षण म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हासोबत सारवलेल्या ओल्या अंगणात उतरलेली भूपाळीची मंतरलेली ओळ... क्षण म्हणजे श्वासांच्या अंतरावर घुसमटलेली अन तरी निसटलेली ती नितळ पावसाची सर... क्षण म्हणजे दव भारल्या धुक्यातली ती गर्भरेशमी ऊब...क्षण म्हणजे... खरं सांगू ? क्षण म्हणजे अनुभव... जिवंत असण्याचा जिवंत असण्याला आलेला जिवंतपणाचा अनुभव !

No comments:

Post a Comment