१
बयो..,
किती अन कशाकशाच भांडवल करशील आता ? प्रत्येक घटनेमागची कारण शोधता शोधता एक दिवस तूच विस्मृतीत गेलेली घटना होशील गं... हे सुख दु:खाचे हिशोब असे नाहीच गं सुटत...उगाच कमावल्या गमावल्याच्या निरगाठी वाढण्याचीच शक्यताच जास्त त्यात...आणि अस अंधारात तरी किती दिवस काढायचे, सवय होईल बघ त्याचीच.. अन मग मुठभर कवडश्याची सुद्धा भीती वाटायला लागेल तुला... ऐकते आहेस न गं? तूच सांग मागून कोणाला काय मिळालायआजवर..अन इथेतर तुझा थेट दावा त्या विधात्याशी.... उत्तर नासलेल्या प्रश्नाचं नशीब का तुला ठावूक नाही बयो? कोश तोडण्यापेक्षा तो जपन अवघड..हो नं? पटतंय नं गं?
शेवटी तू काय मी काय... संदर्भ बदलले तरी आपली माती एकच गं बयो...तुझी घुसमट कळतेय ती त्याचमुळे... पण तरी आपण वेगळ्या अन वेगळेपण जाणवत ते आला क्षण आपण कसा झेलतो ह्यावरून... मुक्तहस्ते 'तो' देतच असतो..आपली ओंजळ कशाने भरायची हे मात्र तुझ तूच ठरवायचं बयो... करशील एवढं?
--------------------------------------------------------------------------
२
गं,
मला बयो म्हणालीस आता तुला काय संबोधु.... सखी, मैत्रीण, आई, माई, ताई, लेक, नात..तू नक्की आहेस तरी कोण ? म्हणून गं.... खूप अनोळखी भासतेस गं आज तू.... कि आज खरीखुरी ओळखतेय तुला?
किती अलगद बोलून गेलीस कोश जप म्हणून.. इतकं का सोप्पय गं ते? आणि आजवर वेगळं तरी काय केलंय मी? तेच तर जपत आलेय.. पण त्याच कोशाच्या गच्च बंद दाराआड आताशा घुसमट जाणवते गं... कळत नाही कशाची पण भीती दाटतेच...उत्तर शोधायचा सोस नाहीच गं..अन प्रश्न कारणं शोधण्याचा नाहीच मुळी... पण नेमक चुकलं कुठे हे तर शोधायला हवं नं.. तेच तर करतेय वर्षानुवर्ष.. पुन्हा नव्याने चुकत..
एक मात्र खरच जाणवतय मला... माझच अनोळखी अस्तित्व.. सहज म्हणून भूतकाळात डोकावायची सुद्धा हिम्मत नाही गं आता.. पाय रुतला तिथेच तर... नुसत्या विचारानेच धडकी भरते
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधीमी कशी होते मलाही आठवावे लागले
आठवतात का गं ह्या ओळी भट्साहेबांच्या....हम्म.. बाकी काय सांगु? तुला कळतच सारं... एकच नं गं आपण... तरी एक सांगु? आलेला प्रत्येक क्षण झेलायचा खूप प्रयत्न केला गं मी ...पण फाटक्या ॐजळिचं प्राक्तन माझं... कसं गं साठवायचं जगणं?
----------------------------------------------------------------------------------
३
बयो,
पुढे लिहू कि नाही ह्या संभ्रमात आहे..तुला पटेल की नाही..रुचेल कि नाही. अन मुख्य म्हणजे मला तुझं भोगणं कमी करायचं आहे वाढवायचं नाही..तरी लिहितेय
तर बयो, तुला माहितेय बयो म्हणजे काय? बयो म्हणजे हाक बाईपणाची.. ती तुला मला वेगळी अशी नाहीच मुळी. ती आहे आपल्यातल्या तिला...स्वत:च बाईपण न उमजलेल्या (किंवा नाकारलेल्या म्हणूया का गं ?) तिला.. म्हणून बयो..
चल एक गम्मत सांगते तुला... एक नं अट्टल गुन्हेगारी कैदी असतो, जन्मठेपेची शिक्षा झालेला.... खूप वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्या वागणुकीत बराच बदल होतो.. अन म्हणून त्याला सोडून देतात.. पण गेले कित्येक दिवस बाहेरच्या जगाशी संबधच नसलेला तो ह्या गर्दीत भांबावून जातो..स्वच्छ सुर्यप्रकाशाही त्याला दिपवून टाकतो .. जो तो त्याच्याकडे अनोळखी नजरेने बघत असतो.. घरी येतो तर बायको, मुलगा झिडकारतात त्याला... त्याच्यातला बदल, चांगुलपणा सहन नाही होत त्यांना... मग काय.. तो बिचारा कैदी.. हताश निराश पुन्हा तुरुंगाकडे परततो... आहे कि नाही गंमत?हम्म..बयो तुझं तसं होऊ नये म्हणून सांगतेय.. अंधाराची सवय नको गं... अन असं स्वत:च्या कोशात जबरदस्तीने गुरफटत गेलं तर त्याचं सूरवंट तरी कसा गं व्हायचं ? अगदी उत्तुंग भरारी एका झेपेत नसतेच गं जमत.. पण निदान पंख पसरायला तर शिक...
कोणाची तरी आई, बहिण, बायको, सून, मुलगी असण्यापेक्षा तुझं बाई असणं जास्त महत्वाचं नाही का गं?फाटक्या ओंजळीच्या बाता करतेस पण त्या सांधाय्चा प्रयत्न तरी कर... जास्तच बोलून गेले का गं? नियती तरी कुठे कमी बोल लावते गं .. ..
-------------------------------------------------------------------------------------
४
गं,
काय म्हणू मी तुला ? काय हा वेडेपणा चाललाय ? आणि मीही शतमूर्ख .. हे सगळं वाचतेय.. का ? काय तर म्हणे पंख पसरून उडायला शिक.... भरारी घे.. .. वाचण्याच्या नादात मला पण पटलं गं ते अन म्हटल उघडावे आपलेही पंख ...पण.. वळून पाहता दिसल्या फक्त छाटल्या गेल्यानंतरच्या भळ्भळत्या जखमा...भरारी घ्यायला पंख कुठे गं माझे ? सणसणुन कळ उठली काळजात ... का अश्या खपल्या काढतेस गं ? जिथे जन्मण्याच्याच हक्क नाही तिथे उडण्याचा अधिकार तरी कसा गं असणार हे का ठावूक नाही तुला ? पंख म्हणजे काय हे हि विसरलेय बघ मी आता.... तुला सांगते लहान होते नं तेव्हा खूप स्वप्न होती गं माझी... रंगबिरंगी आकाशात मोकळं उड्ण्याचं हि त्यातलाच एक....निळ्याभोर ढगांआडचं इंद्रधनुष्य आणायचं होतं मला... दादाच्या शाळेच्या पुस्तकात दिसायचं तसं पिवळधम्म उन अन रिमझिमणारा पाउस घ्यायचा होता मिठीत...... पण कसचं काय... जाऊ दे..जे आहे ते असाच स्वीकारलाय मी... बाईपणाची लाज नाही गं सवय झालीय मला आता.... पण तरी एक विचारू?
आकाशाचा रंग अजूनही तसाच आहे का गं?निळाभोर अस्मानी?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
५
बयो,
अगं तुला कळतय का, तुझ्या पोस्ट्कार्डाचं आता अंतर्देशीय पत्र झालाय....चला हे हि नसे थोडके... वाट मिळायचीच देरी कि पाझर फुटतोच बघ ... खूप बरं वाटतंय आज..पण तरी अस्वस्थ मन ..तुझे प्रश्न घरं पाडतात गं काळजाला...किती अन काय काय भोग गं हे तुझे..
खरय तुझं भरारीच्या बाता मारतेय पण पंख कुठेत गं आपल्याकडे? बाईपणच्या जखमाच तर सांभाळतोय जन्मल्यापासून... किती लहान असतानापासून हे संस्कार घडताहेत गं आपल्यावर? मुलीच्या जातीने असं करायचं नाही, तिने इथे जायचं नाही.. सातच्या आत घरात.... कपड्यालत्या पासून ते अगदी खेळ्ण्यापर्यंत हेच ते बाईपण सतत आदळत राहिलं गं अंगाखांद्यावर.... तसं बघायला गेलं तर कमी पण नाही केलं काही..जेवणखाण, कपडेलत्ते, खेळ्भांडी .. अन हो शिक्षण सुद्धा.. लग्नाच्या बाजारात ते महत्वाचं म्हणून... मिळालं नाही ते फक्त माणूस म्हणून जगण्याचं स्वतंत्र्य.... हम्म.. तसंही स्वत:चे हक्क कधी मागितले गं आपण ? त्यात हा हि एक तसाच .. न मिळालेला ...
कंटाळलिस नं? तेच ते जुनं पुराण ऐकावतेय नं मी? नवीन काय त्यात? ...हम्म.. खरय .. आहे जुनंपुराणं हे पण तरीही ते वर्तमान आहे बयो. अन तेच खुपत .. आजूबाजूला नजर टाकलीस नं तर दिसतील हजारो अश्या बयो आजही .. बंद दाराआड स्वत: ला बंदिस्त करून घेतलेल्या .. अन ह्या अश्या दारावर थाप पडली माझी तर काय होईल गं? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव इतकी बोचरी असते का गं?
--------------------------------------------------------------------------------------------------------
६
गं,
दरवेळी कसे गं तुला इतके तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात? बाईमाणसाला नसावी गं इतकी उठाठेव प्रश्नांची... मुळात ह्या प्रश्नांची उत्तर शोधायला आपला परीघ तरी कुठेय हक्काचा? आपण सगळ्या बांधल्या गेलेलो त्या एका केन्द्रबिंदुशी..हम्म ..पण तो मात्र प्रत्येक वळणावर बदलत जातो.. बाप, भाऊ, नवरा, मुलगा झालंच तर नातुसुद्धा... आपला परीघ मात्र त्यांच्या त्रिज्येत....अन मोडायचं म्हट्लं तरी वर्तुळ कुठे गं मोडता येतं... साधं चौकटीबाहेर पाय टाकायची हिम्मत नाही। बाईपणाची त्रिज्या कशी गं वाढवायची?
तू विचारतेस ह्या बंद कवाडावर तुझी थाप पडली तर काय होईल? माझं काय झालयं ते तर पाहतेच आहेस नं.. तेच होणार.. पहिल्या थापेसारशी जिवाचा थरकाप.. अन दुसर्याच क्षणी आशेचा किरण.. कोणीतरी काढेल बाहेर ह्या अंधार कोठडीतून... मदतीच्या हाताच्या नुसत्या कल्पनेनेच फुलारतो गं जीव.. अस्तीवाची दखल घेतली जाण्याची ती पहिली पायरी... पण त्याचवेळी आठवते तुझ्या कैद्याची गोष्ट... अंधार कोठडीत राहिल्यावर सुर्यप्रकाशाला घाबरणार्या कैद्याची गोष्ट.. आपलं ही तसचं नाही का गं.. रूढी परंपरा,घर कि इज्जत, खानदान का नाम... हे सगळं कैदेहून काय वाईट गं? पाय अडकतो तो इथेच..
तरी तुला वाटतं मी कारणं देतेय? माझ्या ह्या कैदेला मी स्वत:च ओढवलाय ? मला मुक्त व्हायचाच नाहीये? ... अंधाराची सवय बरी नाही हे का मला पटत नाही गं... पण निदान इथेतरी माझं मीपण गवसतं हाच काय तो आधार.. तूच म्हणाली नं अस्तित्वाची जाणीव बोचरी असते म्हणून? मग ते नसलेलं काय वाईट?
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
भट्साहेबांच्या ह्या ओळिपेक्षा वेगळ सांगु तुला? अंधाराच्या काळ्या रंगातही शेवटी बरेच रंग असतात हा शोध लागलाय मला..